रक्त हे सळसळतं ठेवा, 24 तारखेला पुन्हा एकत्र जमा, आदित्य ठाकरेंचे शिवतीर्थावरील विद्यार्थी आंदोलकांना आवाहन

Shivaji Park Protest : आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील आंदोलक विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

रक्त हे सळसळतं ठेवा, 24 तारखेला पुन्हा एकत्र जमा, आदित्य ठाकरेंचे शिवतीर्थावरील विद्यार्थी आंदोलकांना आवाहन
Aaditya and Amit Thackeray meets Student
Image Credit source: Google
| Updated on: Jul 22, 2026 | 8:12 PM

मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात विद्यार्थ्यांकडून नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे पोहोचले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच या विद्यार्थ्यांना 24 जुलै रोजी असणाऱ्या तिरंगा रॅलीत सहभागी होण्याचेही आवाहन केले आहे. आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

सर्वप्रथम तुम्ही इथे आलात, ही ताकद आहे युवकांची. खुप महत्त्वाचं आहे की आपण सगळे असं एकत्र येतो. इथे राजकीय पक्षाचं कोणी आहे का? कोणी अर्बन नक्षलवादी आहेत का? दहशतवादी आहेत का? इथे जे जे हिंदुस्थानी नागरिक असतील त्यांनी वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषणा द्या. हीच आपली ताकद आहे. आज मी आणि अमित वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलो, तिथेही असेच तरूण-तरूणी जमले होते. एक गोष्ट आपल्या सर्वांना मानायला लागेल की, दिल्लीमध्ये झालं ते मुंबई पोलिसांनी केलेलं नाही. त्यांनी कुणालाही हात लावलेला नाही, त्यामुळे आपण त्यांचे आभार मानू.

आपण दिल्लीही हलवू शकतो…

पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, तुम्ही सगळे एकत्र आला आहात हे फार महत्त्वाचं आहे. कोणतेही राजकीय आवाहन न करता ही गर्दी झाली आहे, त्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो, असंच दिल्लीला हलवू शकतो आपण. आपण दोन लोकांसाठी एकत्र आलो आहोत, सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके. सुरुवातीला सरकार चर्चेसाठी आपल्याकडे आलं असतं, पण ते न करता लाठीचार्ज करण्यात आला. आपण दुपारपासून इथे आला आहात, खरोखर मी तुमच्या ताकदीला सलाम करतो. ही देशाची युवा शक्ती आहे, महाराष्ट्राची युवा शक्ती आहे.

पुन्हा एकत्र जमा

आदित्य ठाकरे यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘मी तुम्हा सर्वांना विनंती करत आहे की, पाऊस वाढणार आहे, दिवस मावळणार आहे, पण आपल्याला शांत बसायचं नाही. रक्त हे सळसळतं ठेवायचं आहे. उद्धव साहेब आणि राजसाहेब इतर पक्षांसोबत बोलत आहेत. आपण मुंबईत मोर्चा काढणार आहोत, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही आपली मागणी आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, 24 तारखेला पुन्हा इथे जमायचं आहे. इथे येऊन आपल्याला राष्ट्रगीत गायचं आहे.’

Follow Us