Oxygen Hub: औरंगाबाद शहराचे ऑक्सिजन हब मोकळा श्वास घेणार, हिमायत बागेचा लवकरच फैसला, दस्तूरखुद्द हायकोर्टानेच टोचले महापालिकेचे कान

| Updated on: Jul 05, 2022 | 12:11 PM

Biodiversity of Himayat Bagh: शहराचं ऑक्सिजन हब म्हणून ओळख असलेल्या हिमायतबाग मोकळा श्वास घेणार आहे. हिमायत बागेला अतिक्रमणांचा वेढा पडत आहे. एवढा पुरातन वारसा न जपणा-या महापालिकेच हायकोर्टाने कान टोचले आहे.

Oxygen Hub: औरंगाबाद शहराचे ऑक्सिजन हब मोकळा श्वास घेणार, हिमायत बागेचा लवकरच फैसला, दस्तूरखुद्द हायकोर्टानेच टोचले महापालिकेचे कान
हिमायत बागेतील पुरातन वारसा जपणार
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

हिमायतबाग (Himayat Bagh) हा औरंगाबाद शहराचा (Aurangabad City) पुरातन वारसा (ancient heritage) आहे. पण त्याची मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरु आहे. गेल्या अनेक वर्षात हिमायत बागेला अतिक्रमणांनी वेढा दिला आहे. एवढंच नाही तर बागेतीलच रस्ता ही मध्यंतरी सार्वजनिक वापरासाठी वापरण्यात येत होता. याप्रकरणी सातत्याने निसर्गप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींनी आवाज उठविला. हायकोर्टात याचिका (Petition in court) दाखल केली. न्यायालयाच्या दणक्यानंतर या प्रकारांना आळा बसला असला तरी येथील जैवविविधता (Biodiversity) आणि जैवसंपदा (Bioresources) टिकवण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाही.त्याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हिमायतबागेला जैवविविधता स्थळ जाहीर करण्याबाबत महापालिकेने (municipal corporation) 2 आठवड्यात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले. राज्य शासनाने या प्रस्तावावर दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देश मुख्य न्यायमुर्ती दिपाकंर दत्ता आणि न्या. रवींद्र व्ही. घुगे यांनी दिले. त्यामुळे आता शहरवासीयांना ऑक्सिजन पुरवणा-या या बागेतील मानवी हस्तक्षेपांना आळा बसेल अशी आशा आहे.

शक्कर बावडीतील काम थांबवले

अंब्रेला वेलफेअर फाउंडेशनचे अ‍ॅड. संदेश हांगे यांनी स्वत:हून (पार्टी इन पर्सन) ही याचिका दाखल केली होती. याचिकेनुसार शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना विविध जलस्रोतांच्या माध्यमातून प्रशासनाकडून पावसाळा सुरू झाल्यानंतर उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांनी प्रशासकीय आदेश काढून शक्कर बावडी, बैलगोठा बावडी, मोसंबी बावडी व दत्त मंदिर बावडी या जुन्या ऐतिहासिक विहिरींचे अधिग्रहण केले. त्यापैकी शक्कर बावडीतील गाळ जेसीबीने काढणे सुरू झाले. मात्र हिमायतबाग जैवविविधतेने नटलेला वारसास्थळाचा भाग असून यंत्राद्वारे गाळ काढण्यासारख्या कामामुळे येथील ऐतिहासिक संरक्षित विहिरीस बाधा पोहचत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता.
हिमायतबाग परिसरातील शक्कर बावडीमधील गाळ जेसीबीद्वारे उपसण्याचे सुरू असलेले काम तातडीने थांबवून तिथे पुढील आदेशापर्यंत कुठलीही कार्यवाही करू नये, असे अंतरिम आदेश खंडपीठाने 15 जून रोजी दिले होते. सदर अंतरिम आदेश कायम राहतील,असे न्यायालयाने म्हटले आहे. प्रकरणात केंद्र शासनाकडून अ‍ॅड. अजय तल्हार, राज्य शासनाकडून मुख्य सरकारी वकील डी.आर. काळे, कृषी विद्यापीठाकडून राजेंद्र बोरा तर महापालिकेकडून अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी बाजू मांडली.

हे सुद्धा वाचा

813 पुरातन वृक्ष

हिमायत बाग म्हणजे जैवविविधेतेचा खजिना आहे. शहराचा शिल्पकार मलिक अंबर याने पाणीपुरवठ्याची योजना तयार केली. सलीम अली सरोवरातून या भागाला पाणी पुरवले. या सरोवराशेजारीच औरंगजेबाने तब्बल तीनशे एकर परिसरात दगड, रेती आणि मातीची भर घालून हिमायत बाग तयार केली.या बागेत सतराव्या शतकापासूनच्या अनेक दुर्मिळ वनस्पती होत्य. आज यातील अनेक वनस्पती नामशेष झाल्या आहेत. येथील बागेत आंब्याच्या विविध जातींची 900 झाडे आहेत. याशिवाय चिकू, नारळ, आवळा, सुपारी, कोकम, चिंच, कवठ व अशोकासह अनेक शोभेची झाडेही आहेत. येथील फळ संशोधन केंद्र तर अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. बागेत अनेक रोपवाटिकाही आहेत. या ठिकणी चिंचेची नवी कलमे करण्याचे काम होते. जांभूळ, आंबे, चिंचा यांची विक्री ही केली जाते.