मोदी है तो मुमकीन है, घोषणेची धनंजय मुंडे यांनी उडवली खिल्ली, परळीतील सत्कार सोहळ्यात चौफेर फटकेबाजी

| Updated on: May 28, 2023 | 5:42 AM

'मोदी है तो मुमकिन है'च्या झमेल्यामध्ये अडकून राहू नका. भाजपाचे राजकारण याच पद्धतीचे आहे. आपण अनेक वेळा रोष व्यक्त करतो.

मोदी है तो मुमकीन है, घोषणेची धनंजय मुंडे यांनी उडवली खिल्ली, परळीतील सत्कार सोहळ्यात चौफेर फटकेबाजी
Image Credit source: social media
Follow us on

संभाजी मुंडे, प्रतिनिधी, बीड : पुण्याच्या कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा लोणारी समाजाच्या मेळाव्यात परळी येथे सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला माजी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी चौफेर फटकेबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप समर्थकांच्या ‘मोदी है तो मुमकिन है’ या घोषणेची चांगलीच खिल्ली उडवली. आमदार धंगेकरांच्या कामाचे कौतुक केले. धनशक्ती पेक्षा कधीही जनशक्ती मोठी असल्याचे यावेळी धनंजय मुंडे म्हणाले. परळीतील मुक्ताई लॉन्स येथे झालेल्या या मेळाव्याला लोणारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार धंगेकर यांना स्वत: फेटा बांधून स्वागत केले.

हे सुद्धा वाचा

धनंजय मुंडे म्हणाले, रवींद्र धंगेकर यांना पराजित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री आले. पण मला पाडण्यासाठी तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह केंद्रातले मोठे मोठे नेते आले होते. परंतु एकदा का सर्वसामान्य माणसाने ठरवलं तर काम करणाऱ्या, संघर्षशील धंगेकर आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच विजय मिळतो, हे सिद्ध झाले आहे.

लोणारवाडी ग्रामपंचायत आमच्या ताब्यात

परळी तालुक्यातील लोणारवाडी ग्रामपंचायत ताब्यात आणण्यासाठी आम्ही गेल्या पंधरा वर्षांपासून प्रयत्न करत होतो. परंतु यश मिळाले नाही. यावेळी मात्र जनतेनेच स्वतःच ठरवले आणि तब्बल पंधरा वर्षानंतर लोणारवाडी ग्रामपंचायत जनतेनेच आमच्या ताब्यात दिली आहे.

शेवटी जनशक्ती महत्त्वाची ठरते

कसब्याच्या निवडणुकीमध्ये भाजपाने प्रचंड धनसंपदा आणि धनशक्तीचा वापर केला. परंतु रवींद्र धंगेकरांसारख्या फाटक्या कार्यकर्त्याच्या मागे जनतेने आपली ताकद लावली. त्यामुळे धनशक्ती कितीही प्रभावी ठरविण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी जनशक्तीच महत्त्वाची ठरते, असं धनंजय मुंडे म्हणाले.

अशा झमेल्यात पडू नका

‘मोदी है तो मुमकिन है’च्या झमेल्यामध्ये अडकून राहू नका. भाजपाचे राजकारण याच पद्धतीचे आहे. आपण अनेक वेळा रोष व्यक्त करतो. परंतु मध्येच कुठलातरी भावनिक, देश प्रेमाचा, मुद्दा पुढे आणला जातो, धर्माचा मुद्दा पुढे आणला जातो आणि मग आपण त्यालाच बळी पडून सरकारवरचा राग विसरून त्यांनाच मतदान करतो. हा एक झमेला असून या ‘मोदी है तो मुमकीन है’च्या झमेल्यात अडकू नका, असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं.