‘मातोश्रीची झोप उडालीय, आता सगळं बाहेर येणार’, नारायण राणे यांचा खळबळजनक दावा

| Updated on: Dec 22, 2022 | 8:29 PM

दिशा सालियन हत्या प्रकरणी भाजप नेते आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा निशाणा साधलाय.

मातोश्रीची झोप उडालीय, आता सगळं बाहेर येणार, नारायण राणे यांचा खळबळजनक दावा
Follow us on

मुंबई : दिशा सालियन हत्या प्रकरणी भाजप नेते आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा निशाणा साधलाय. विशेष म्हणजे दिशा सालियन प्रकरणी राज्य सरकारने एसआयटी चौकशी लावल्यामुळे ‘मातोश्री’ची झोप उडाल्याचा दावा नारायण राणे यांनी केला. “ठाकरेंनी अनेक भ्रष्टाचार पचवायचा प्रयत्न केला. आता सगळं बाहेर येणार. ग्रामपंचायत निवडणुकीत उडालेला धुव्वा, मोर्चाचा फज्जा आणि आता दिशा सालियन प्रकरणी एसआयटी लावल्यामुळे मातोश्रीची झोप उडाली आहे, असं माझं स्पष्ट मत आहे”, असा दावा नारायण राणे यांनी केला.

“आतापर्यंत ठाकरे कुटुंब आणि मातोश्रीवर जे आरोप झाले त्याबद्दल कुणीच काही बोलत नाही. ना उद्धव बोलत, ना आदित्य बोलत. काय बोलतोय पिल्लू? भडभड बाहेर येतो, मीडिया ऐकते म्हणून घणाघात, अरे काय त्याचा घणाघात? एक विषय माहिती नाही. कशाचा अर्थ कुणालाही लावतो. त्यामुळे आदित्य ठाकरे सुशांत आणि दिशा सालियनच्या केसमध्ये आरोपी आहे. त्याला वाचवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केला”, असा गंभीर आरोप नारायण राणेंनी केला.

हे सुद्धा वाचा

“तो काय व्यवहार झाला मला माहिती आहे. दिशाच्या आई-वडिलांना कुठे बोलावण्यात आलं, कुठे ठेवण्यात आलं, हे मला माहिती नाही. हत्या झाल्यानंतर कुटुंबाने सांगितलं आमचा संबंध नाही तरीसुद्धा संपत का? हत्या म्हणजे हत्या. खून. कलम 302. हे आता नको ते मुद्दे नका काढू”, असं राणे म्हणाले.

“एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं सुद्धा म्हणणं आहे की, आदित्य ठाकरे हत्येच्या वेळी त्या ठिकाणी होता. वेळ आल्यावर त्या अधिकाऱ्याचं सुद्धा नाव सांगेन”, असंदेखील ते म्हणाले.

“आदित्य ठाकरे सांगत आहेत की माझा की संबंध नाही. 32 वर्षाच्या तरुणाने सर्वांना पुरुन उरले, असे बोलत आहेत. ते टायगर आहेत म्हणे. अरे कसला टायगर. हा पुरुषार्थ आहे का? सत्तेचा दुरुपयोग करुन, एका मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणं हा पुरुषार्थता आहे का? आता कळेलच. चौकशी होऊ दे”, असा घणाघात नारायण राणे यांनी केला.

“दिशा सालियनची हत्या आहे हे आम्ही सांगत होतो. दिशा प्रकरण महाविकास आघाडी सरकारने दडपण्याचं काम केलं”, असा आरोप राणेंनी केला.

“संजय राऊत आज जे काही बोलतात, फक्त इकडचा विषय तिकडे काढतात. राहुल शेवाळे यांचा विषय काढतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो भ्रष्टाचार सांगतात तो सांगाना”, असं आव्हान त्यांनी दिलं.