‘मराठी व्यक्तीने उद्योगात उतरायचे नाही का?’, हॉटेल प्रकरणात आरोप झाल्यानंतर संजय शिरसाट यांचा सवाल

छत्रपती संभाजीनगरातील हॉटेल विट्स लिलाव प्रक्रियेवर शिवसेना उबाठाकडून आक्षेप घेतले गेले. त्यावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी उत्तर दिले. मी सांगतो त्यावर विश्वास ठेऊ नका. या संपूर्ण प्रकरणाची प्रशासकीय माहिती काढा.

मराठी व्यक्तीने उद्योगात उतरायचे नाही का?, हॉटेल प्रकरणात आरोप झाल्यानंतर संजय शिरसाट यांचा सवाल
संजय शिरसाट
Jitendra Zavar | Updated on: May 29, 2025 | 11:29 AM

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगरातील हॉटेल विट्स लिलाव प्रक्रियेतून घेतले. या हॉटेलची किंमत ११० कोटी होती, परंतु ते केवळ ६७ कोटी रुपयांत विकण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. या व्यवहारातून त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांना घेरले होते. त्याला गुरुवारी संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे. लिलाव प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर आहे. ज्यांची रात्रीची दारू उतरत नाही, ते असे बोलतात, असे संजय राऊत यांचे नाव न घेता शिरसाट यांनी म्हटले.

संजय शिरसाट म्हणाले, हॉटेलची संपूर्ण लिलाव प्रक्रिया कायदेशीर आहे. बोली लावताना डिपॉझिट भरावे लागते. ते भरल्यानंतर लिलाव प्रक्रियेत भाग घेतला. आता एका महिन्यात २५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतर बँकेची प्रक्रिया पार पाडत तीन महिन्यांत उर्वरित पैसे भरावे लागतील. मगच संपूर्ण व्यवहार पूर्ण होतील. या संपूर्ण लिलाव प्रक्रियेत सर्व व्यवहार कायदेशीर झाले आहे. परंतु दलालांनी बदनाम करण्याचे काम सुरु केले. रात्रीची ज्याची दारू उतरत नाही, ते असे बोलत असतात, असा टोला संजय शिरसाट यांनी नाव न घेता लगावला.

संजय शिससाट यांनी सांगितले की, मी सांगतो त्यावर विश्वास ठेऊ नका. या संपूर्ण प्रकरणाची प्रशासकीय माहिती काढा. या हॉटेलच्या लिलावाची ही सातवी वेळ होती. मराठी व्यक्तीचे नाव घेताना लाज वाटत नाही का? मराठी माणसांना पाठिंबा देण्याऐवजी त्यांचे पाय ओढले जात आहेत. त्यांचे मनपात जे दलाल होते, त्यात एकही मराठी व्यक्ती नव्हता. व्यक्तीने राजकारण करावे, पण इतक्या खालच्या स्तरावर राजकारण करु नये. या प्रकरणात कशी सूत्र फिरली, मला बदनाम करण्याचा कसा प्रयत्न झाला, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी योग्य वेळी देईल, असे त्यांनी म्हटले.

सन २०१२ च्या मूल्यांकन अहवालानुसार या हॉटेलची किंमत ११० कोटी रुपये होती. आता २०२५ मध्ये त्यात आणखी वाढ झाली असेल. मग ते केवळ ६७ कोटी रुपयांत कसे विकले, असा सवाल राऊत यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us