नवी दिल्ली : देशातील सध्याचे राजकीय वातावरण हे मशिंदीवरील भोंगे, हनुमान चालीसा, बुल्डोजर मॉडेल आणि आता काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद यांच्यातील वादामुळे चांगलेच तापलेले आहे. राजकीय वातावरण तापलेले असतानाच देशातील तापमान ही कमी जास्त होत आहे. तर अनेक राज्यात उष्णतेच्या लाटा येत आहेत. त्यातच भर म्हणून अनेक राज्यात कोळशाची कमतरतेमुळे वीजेची टंचाई होत आहे. ज्यामुळे जनतेला लोडशेडींगला (Loadshedding) तोंड द्यावे लागत आहे. त्यातच आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह मध्य, वायव्य आणि उत्तर भारताच्या अनेक (heat wave in maharashtra) भागांत उष्णतेच्या लाटेने कहर केल्याचे दिसून आले. देशातील 36 पैकी 18 हवामानशास्त्रीय उपविभागांमधील तब्बल ७६ केंद्रांवर गुरुवारी 43 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदले गेल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) सांगण्यात आले. तर याचा फटका महाराष्ट्राला बसू शकतो असे विभागाने सांगितले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार उत्तर, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या विविध भागात उष्णतेची लाट येऊ शकते. 6 ते 9 मे दरम्यान नागपूरसह अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय, बहुतांश शहरांमध्ये महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक ते मध्यम श्रेणीत नोंदवला जात आहे. तर शुक्रवारी महाराष्ट्राच्या बहुतांश भागात हवामान स्वच्छ राहिलं. मात्र, पुढील काही दिवस आकाशात ढगाळ वातावरण आणि उन्हाचा खेळ सुरूच राहणार आहे. दरम्यान, राज्यातील तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी नोंदवलं जात आहे. जाणून घेऊया, शुक्रवारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसं असेल..
शुक्रवारी मुंबईत कमाल तापमान 35 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहिलं. हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 105 वर नोंदवलं गेलं.
पुण्यात कमाल तापमान 40 आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहिलं. येथेही हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 164 नोंदवला गेला.
नागपुरात कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा राहिलं. हलके ढगही होते. हवा गुणवत्ता निर्देशांक 142 आहे, जो ‘मध्यम’ श्रेणीत येतो.
नाशिकमध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहिलं. हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीतील 107 आहे.
औरंगाबादमध्ये कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश निरभ्र राहिलं. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीतील 109 आहे.