
किशोर पाटील, जळगाव दि. 19 नोव्हेंबर | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले. 2024 पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांचे पासपोर्ट जप्त करा, कारण ते देश सोडून पळून जाणार आहेत. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटले. जळगावातून मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊत हे मोठे ज्योतिषी आहेत. मात्र त्यांचे ज्योतिष्य नेहमीच खोटं ठरत. त्यांनी ही विद्या अधिक सबळ करून घेतली पाहिजे, असा सणसणीत टोला दीपक केसरकर यांनी लगावला.
जळगाव दौऱ्यावर आले असताना दीपक केसरकर यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. जे जे महाराष्ट्राच्या वाट्याला आडव्या आले ते याच मातीत गाडले गेले. दोन गुजराती नक्कीच गाढले जातील, अशी टीका संजय राऊत यांनी केली. त्यावर बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत हे स्वत:ला महाराष्ट्राचे नेते म्हणून घेत आहेत. पण संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र खूप मोठा आहे. हा महाराष्ट्र जनतेचा आहे. संजय राऊत यांची ही खाजगी मालमत्ता नाही.
मराठा समाजाला आरक्षण देणे सरकारची जबाबदारी आहे. इम्पेरियल डेटासाठी आवश्यक सर्वेक्षणासाठी सरकार व मराठा समाजाने हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. क्युरेटिव्ह पिटिशनवर सर्वोच्च न्यायालयाने जे मुद्दे स्पष्ट केले आहे, त्या मुद्द्यांवर आपल्याला व्यवस्थित स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. त्यासाठी आवश्यक जो डाटा गोळा करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी मराठा समाजच नाहीतर इतर सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आरक्षणासाठी आपली बाजू बळकट करणे आणि न्यायालयात टिकणारे आरक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार जे आरक्षण देईल, ते टिकणारे असेल याची मला खात्री आहे.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही पद्धतीने धक्का लागणार नाही, हे सरकारने स्पष्ट केले आहे. वाद निर्माण होणारी वक्तव्य करण्यापासून सर्वांनी अलिप्त राहिले पाहिजे. सरकारने दोघांच्या मागण्या मान्य असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यावर आपसात संघर्ष कशाला? सामाजिक ऐक्य हे महाराष्ट्राचे बलस्थान आहे. एकीकडे शिक्षकांची भरती प्रक्रिया तर दुसरीकडे मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी या दोघांमुळे भरती परिणाम होवू शकतो का? या प्रश्नावर मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, आर्थिक मागास प्रवर्गाच आरक्षणाचा पूर्ण फायदा उमेदवारांना दिला जाईल. ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र त्यांना ओबीसी आरक्षणाचा फायदा मिळेल.