ब्राह्मण समाजाचा आदरच, वक्तव्याचा विपर्यास, एकनाथ खडसेंची दिलगिरी
ब्राह्मण महासंघाच्या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्यावर टीका करताना ब्राह्मण समाजाचा उल्लेख करुन आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यावरुन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ (Brahmin Mahasangh) तसंच ब्राह्मण समाज आक्रमक झाला. एकनाथ खडसे यांनी याप्रकरणी त्वरित माफी मागावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केल्यानंतर नाथाभाऊंनी फेसबुक पोस्टद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. (Eknath Khadase Clarification on his Statement brahmin Community)
“माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे, असं सांगत झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो”, असं एकनाथ खडसे म्हणाले. यासदंर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 9, 2020
एका ब्राह्मणाला मी मुख्यमंत्रिपदाचं दान दिलं, असं जाहीर वक्तव्य करुन एकनाथ खडसे गोत्यात आले. खडसेंच्या वक्तव्यानंतर ब्राह्मण महासंघाने तीव्र आक्षेप नोंदवून त्यांनी आपले विधान त्वरित मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी दिला होता. महासंघाच्या इशाऱ्यानंतर खडसेंनी फेसबुक पोस्ट लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे.
एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले होते?
एकनाथ खडसे यांनी 6 नोव्हेंबर रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. “मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असं समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिलं”, असं खडसे म्हणाले होते.
गल्लीतले कार्यकर्ते मी मोठे केले आणि आता तेच मला अक्कल शिकवायला लागले, असंही म्हणत खडसेंनी भाजपवर टीका केली होती. ‘मला अक्कल शिकायला चालले होते. मी अख्खं आयुष्य भारतीय जनता पार्टीला दिलं. माझा मुलगा गेला तरीही मी भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसाने छेळलं.’ असं म्हणत खडसेंनी देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला होता.
(Eknath Khadase Clarification on his Statement brahmin Community)
संबंधित बातम्या
‘राष्ट्रवादीचा गुण नाही पण वाण लागला’, खडसेंच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक