राष्ट्रवादी शरद पवारांपुरती मर्यादित, तर अध्यक्ष नसलेल्या काँग्रेसची स्थिती हास्यास्पद : चंद्रशेखर बावनकुळे
राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्ध्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ शरद पवारांपुरता सिमित राहिल आणि अध्यक्ष नसलेल्या काँग्रेसची स्थिती हास्यास्पद असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.
वर्धा : राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्ध्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ शरद पवारांपुरता सिमित राहिल आणि अध्यक्ष नसलेल्या काँग्रेसची स्थिती हास्यास्पद असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “काँग्रेसमध्ये राष्ट्रीय नेतृत्त्व कुणी करावं, याबद्दल एक-एक महिना निर्णय होत नाही. ज्या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नाही, त्या पक्षाचे हेच हाल होणार आहे. त्यामुळेच मोठ्या नेत्यापासून अगदी गावातील कार्यकर्ते देखील काँग्रेस सोडून भाजप आणि शिवेसेनेत प्रवेश करत आहे. मोदींवर विश्वास आहे. मोदी सर्वोत्कृष्टपणे देश पुढे नेत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वाईट दिवसांतही राज्य चांगलं ठेवण्याचं काम केलं आहे.”
‘धोरण नाही, नेता नाही, नेतृत्त्व नाही, कार्यकर्ते डिमॉरलाईज’
यावेळी बावनकुळे यांनी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविषयी देखील टीपण्णी केली. ते म्हणाले, “बाळासाहेब थोरात हे नवे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना असं काही सांगावं लागणार आहे. मात्र, खासगीत त्यांनाही पक्ष अडचणीत असल्याचे माहित आहे. सध्या पक्षाला नेता नाही, धोरण नाही, नेता नाही, नेतृत्त्व नाही, कार्यकर्ते डिमॉरलाईज झाले आहेत. ज्या पक्षाचं सैनिकच डिमॉरलाईज झाले असतील, ते युद्ध कसे लढणार? सैन्यच नसल्याने बुथवर काम करायला कुणीही उपलब्ध नाही. ज्या पक्षाला सैनिकच नाहीत, तो पक्ष हरणारच आहे. हा इतिहास आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
‘दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलीस अधिक्षकांसोबत प्लॅन करणार’
चंद्रशेखर बावनकुळे यांनी दारूबंदीच्या अंमलबजावणीकरता पोलीस अधिक्षक आणि मी संयुक्त नियोजन करत असल्याचंही नमूद केल. मी जनतेलादेखील माझ्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविण्याचं आवाहन केलं आहे. मी कडक कारवाई करणार आहे. दारूबंदी करण्यासाठी प्रशासन कामाला लागेल. नवीन कायद्यात कडक बंधन येत आहे. आता नव्या तरतुदीनुसार नव्या शिक्षा आणि दंड होईल आणि कोठडीत जावे लागेल, असाही इशार त्यांनी दिली.