बर्ड फ्ल्यूचा हाहाकार… थेट 4 दिवसात सुमारे 2 लाख कोंबड्या मारल्या, लाखो अंडीही नष्ट, आकडा समोर

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा मोठा उद्रेक झाला आहे, ज्यामुळे अवघ्या चार दिवसांत सुमारे 2 लाख कोंबड्या मारण्यात आल्या आणि लाखो अंडी नष्ट करण्यात आली. प्रशासनाने युद्धपातळीवर किलिंग ऑपरेशन राबवले असून, परिसरातील नागरिकांना चिकन व अंडी न खाण्याचे आवाहन केले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह इतर ठिकाणीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बर्ड फ्ल्यूचा हाहाकार... थेट 4 दिवसात सुमारे 2 लाख कोंबड्या मारल्या, लाखो अंडीही नष्ट, आकडा समोर
बर्ड फ्ल्यूचा हाहाकार
| Updated on: May 05, 2026 | 1:16 PM

राज्यातील नंदूरबार जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूने हाहाकार उडवला आहे. नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथे अनेक पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागन झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून ज्या ज्या पोल्ट्री फार्मवर कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे, त्या ठिकाणच्या सर्व कोंबड्या मारण्यास सुरुवात झाली आहे. तसेच अंडेही नष्ट केले जात आहेत. तसेच या भागातील नागरिकांना चिकन आणि अंडी खाण्यास मनाई करण्यात आली असून आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

नवापूर परिसरात बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठी आणि कठोर कारवाई हाती घेतली आहे. या चार दिवसांत तब्बल 8 पोल्ट्री फार्ममधील 1 लाख 93 हजार 667 पक्ष्यांचे किलिंग करण्यात आले आहे. यासोबतच 8 लाखांहून अधिक अंडी नष्ट करण्यात आली असून सुमारे 21. 22 मॅट्रिक टन पशुखाद्य जमिनीत गाडून नष्ट करण्यात आले आहे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. संजय खाचणे यांनी ही माहिती दिली आहे. बर्ड फ्यू संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. तीन पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी बाधित क्षेत्राची पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कलिंग ऑपरेशन राबवण्यात येत असून त्यासाठी सुमारे 150 कर्मचाऱ्यांच्या 25 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संसर्ग रोखण्यासाठी 1 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर अशा परिघात क्षेत्र निश्चित करून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. इतर पोल्ट्री फार्ममधील नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी स्पष्ट केले आहे.

मालेगावसह नाशिक जिल्हा अलर्ट

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर भागात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्याने मालेगावसह नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आले असून सर्व कुक्कुटपालक आणि पोल्ट्री फार्म चालकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे. पक्ष्यांचा अचानक मृत्यू, खाद्य-पाणी कमी घेणे, सुस्ती किंवा अंडी उत्पादन घटल्यास तात्काळ प्रशासनाला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us