उल्हासनगर – तुम्हाला मंत्रीपद हवं आहे का, शिंदे-भाजपा सरकारमध्ये दोन मंत्री पदे मनसेला देणार आहेत, यावर आपलं काय मत आहे, अशी विचारणा मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray)यांना करण्यात आली होती. त्यावर आपल्याला मंत्रीपद नको आहे, ती अफवा आहे, असे ते म्हणाले. मात्र आम्हाला जर गृहमंत्री पद (Home minister)मिळाले तर शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis Government)यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करू, असे सूतोवाच अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. मात्र याबाबत कॅमेरासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला. मनविसे आणि पक्ष बांधणीसाठी कोकण दौऱ्यावर असलेल्या अमित ठाकरे यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. त्यानंतर याची बरीच चर्चा आणि बातम्या झाल्यानंतर त्यांनी कल्याणात या चर्चेला पूर्णविराम देण्याचाही प्रयत्न केला.
त्यानंतर कल्याणमध्ये मनसेला मंत्रीपद मिळणार का, हा प्रश्न पुन्हा अमित ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरेंच्या मंत्रीमंडळात मंत्री व्हायला आवडेल, असं सांगत अमित ठाकरे यांनी मंत्री होणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. महासंपर्क विद्यार्थी संवाद अभियानांतर्गत अमित ठाकरे यांनी कल्याणमध्ये विद्यार्थी आणि मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
काही संघटनात्मक बदल देखील केले जातील, असेही यावेळी अमित ठाकरे यांनी सांगितले आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा संघर्ष एकिकडे सुरु असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
मनसेचे नेते अमित ठाकरे सक्रिय झाले असून महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठका-संवाद सुरू केला आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यात स्थापन झाले असले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. या सगळ्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची बाजू न घेता भाजपाची बाजू घेतल्याचे दिसते आहे. या सगळ्या घडामोडी होण्यापूर्वी त्यांनी उपस्थित केलेला हनुमान चालिसाचा मुद्दा, अयोध्या दौऱ्याची दिलेली हाक, या सगळ्या घोषणांतून राज ठाकरे हे भाजपासोबत जात असल्याचे संकेत मिळत होते. राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाल्याने ते काही दिवस विश्रांती घेत असतानाच राज्यात बंड झाले. या काळातही त्यांचे आणि एकनाथ शिंदे यांचे फोनवरुन संभाषण झाल्याची माहिती समोर आली होती. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांना राज ठाकरेंनी जाहीर पत्र लिहित त्यांचे कौतुक केले होते. त्यानंतर फडणवीसांनीही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांच्या शीवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांची भेटही घेतली होती. त्या वेळेपासून मनसे सत्तेत सहभागी होईल असे सांगण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्ष आणि विश्वासनत ठरावावेळीही मनसेच्या एका आमदाराने शिंदे यांनाच पाठिंबा दिला होता. आगामी महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे हे भाजपासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे.