मोदींचं पंतप्रधानपद जाणार? 8 महिन्यात मोठं काहीतरी घडणार, राहुल गांधींचा सर्वात मोठा दावा
Rahul Gandhi on Modi : आज दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठं विधान केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्रमोद जगताप, प्रतिनिधी, दिल्ली: राजधानी दिल्लीत आज पक्षाच्या मुख्यालयात बुधवारी काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि पक्षाच्या भविष्यातील रणनीतीबाबत निर्णय घेण्यात आले. आजच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठं विधान केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर राहणार नाहीत
काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीला काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 ते 8 महिन्यांत पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असे राहुल गांधी यांनी बैठकीत म्हटल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदी राजकीयदृष्ट्या संपले असून ते सध्या राजकीयदृष्ट्या गुडघ्यावर आले असल्याचेही गांधींनी म्हटल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या बैठकीतील या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आगामी काळात केंद्र सरकारविरोधात काँग्रेस आणखी आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता या बैठकीतून दिसून येत आहे.
छात्रों की गूंज कार्यक्रम देशभर आयोजित करण्याचा प्रस्ताव
दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम केवळ एका ठिकाणी न ठेवता राहुल गांधी यांच्यासह पक्षातील इतर प्रमुख नेत्यांनीही देशभरात आयोजित करण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडल्याची माहिती आहे. हा कार्यक्रम सुमारे 800 ठिकाणी घेण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले जात आहे. त्यातून विद्यार्थी आणि तरुणांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
तसेच अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित देणगीच्या मुद्द्यावरूनही काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे. ‘राम मंदिर दान चोरी’ हा मुद्दा केवळ उत्तर प्रदेशपुरता मर्यादित न ठेवता देशभरातील घराघरात पोहोचवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे. CWC बैठकीतील चर्चांमधून काँग्रेस आगामी काळात केंद्र सरकारविरोधात जनमत तयार करण्यासाठी विविध मुद्दे आक्रमकपणे मांडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
