मुंबई : अनेक राज्यांतून पावसाने काढता पाय घेतला आहे. मात्र महाराष्ट्रातून मान्सूनच्या (Monsoon in Maharashtra) परतीच्या प्रवासाला उशिर होणार आहे. राज्यातील पावसाचा मुक्काम वाढला असून 20 ऑक्टोबरनंतरच पाऊस महाराष्ट्रातून (Rain in Maharashtra) माघारी फिरण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department) हा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मधेच उकाड्याने होणारे मुंबईकर आणि महाराष्ट्रातील नागरिक अधूनमधून पावसाचा गारवादेखील एन्जॉय करू शकणार आहेत.
पावसाळ्याचा महिना संपला तरी पावसाने राज्यभर माजवलेल्या हाहाःकारामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली. कापणीला आलेल्या पिकांचं मोठं झालं आहे. पिकं वाहून गेली तर पिककर्ज कसं फेडायचं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे.
मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पावसाची अधूनमधून हजेरी लागत आहे. ह्या पावसाने कमाल तापमानाची सरासरी पातळी घसरली आहे. मात्र हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तापमानाचा पारा कमी असूनदेखील अनेक भागांतील नागरिक उकाड्याने हैराण होत आहेत.
यंदा आतापर्यंत पावसाची समाधानकारक हजेरी लागली आहे. त्यामुळे बहुतांश तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. त्यातच आता 20 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे अनेक भागांतील पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
एकीकडे पावसाच्या हजेरीमुळे ऑक्टोबर हीटचा तडाखा कमी जाणवणार आहे. मात्र याच पावसाच्या हजेरीमुळे गरबाप्रेमींच्या आनंदावर पाणी फेरले जाणार आहे. रात्रीच्या सुमारास पाऊस कोसळल्यानंतर गरब्यातील उत्साहावर विरजण पडणार आहे.
आजदेखील मुंबईच्या उपनगरांत अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. बोरिवली, भांडुप परिसरात पावसाने जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ बरसात सुरु ठेवली. त्यामुळे रस्ते निसरडे झाल्यानंतर त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. जागोजागी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र उपनगरात दिसले.