‘नारायण राणे आणि राज ठाकरे शिवसेनेतून एकत्र फुटणार होते’, किशोरी पेडणेकर यांचा मोठा गौप्यस्फोट

संदीप देशपांडे यांच्या आरोपांना आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी संदीप देशपांडे यांच्यावर सडकून टीका केलीय.

नारायण राणे आणि राज ठाकरे शिवसेनेतून एकत्र फुटणार होते, किशोरी पेडणेकर यांचा मोठा गौप्यस्फोट
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: Chetan Patil | Updated on: Feb 25, 2023 | 10:00 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आज मोठा गौप्यस्फोट केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांना शिवसैनिकांच्या माध्यमातून मारण्याची सुपारी देण्यात आल्याचा गौप्यस्फोट संदीप देशपांडे यांनी केलाय. “मुंबईतल्या गुंडांना शिवसेनेच्या माध्यमातून राज ठाकरेंची सुपारी दिली होती. मालवणमध्ये राज ठाकरेंच्या घातपाताचं षडयंत्र होतं. नारायण राणेंवर नाव येण्यासाठी मालवणमध्ये घातपाताचं षडयंत्र आखलं होतं. आपल्या पक्षातील प्रतिस्पर्धीचा काटा काढता येईल, अशाप्रकारचं नीच राजकारण झालं होतं”, असा गंभीर आरोप संदीप देशपांडे यांनी केला. त्यांच्या या आरोपांना आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी संदीप देशपांडे यांच्यावर सडकून टीका केलीय.

“चौका पांडे यांना इतक्या वर्षांनी जाग आली का? त्या दौऱ्यात मी सुद्धा होते. राजापूर पर्यंत गेले. नंतर राज ठाकरे यांनी दौरा कॅन्सल केला. चौका पांडे यांच्या जीभेला हाड नाही. त्यांचं एक हाड दिल्लीत आहे म्हणून जीभ सैल सुटली आहे. राणे आणि हे एकत्र फुटणार होते. महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे उठ दुपारी घे सुपारी”, असा घणाघात किशोरी पेडणेकर यांनी केला.

संदीप देशपांडे यांचा नेमका आरोप काय?

“ज्यावेळी 1988 ला राज ठाकरे भारतीय विद्यार्थी सेना चालवत होते तेव्हा उद्धव ठाकरे हे फोटो काढत होते. जाहीरात एजन्सी चालवत होते. 1995 मध्ये राज ठाकरेंनी 80 सभा घेतल्या. तीन महिने राज ठाकरे सभा करत फिरत होते. ज्यावेळी 1995 मध्ये शिवसेना भाजपाची सत्ता आली त्यावेळी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायला लागली”, असा दावा संदीप देशपांडे यांनी केला.

“राज ठाकरेंचे नाव जेव्हा बाळासाहेबांच्या नंतरचा नेता म्हणून पुढे येत होते, तेव्हा 1995 ते 2000 पर्यंत त्यांच्या विरोधात षडयंत्र रचायला सुरुवात झाली. 2000 साली उद्धव ठाकरेंची अस्वस्थता वाढायला लागली. 2002 मध्ये बाळासाहेबांच्या इच्छेखातर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचे नाव कार्याध्यक्ष म्हणून घोषित केले”, असं संदीप देशपांडे म्हणाले.

“यानंतर राज ठाकरेंच्या सहकाऱ्यांनी गळचेपी करण्यास सुरुवात केली. प्रवीण दरेकरांचे म्हाडाचे तिकीट जाहीर केले आणि दुसऱ्याच दिवशी कापले. नारायण राणेंनी बंड केले तेव्हा मालवणला एकाही शिवसैनिकांची जायची हिंमत नव्हती. तेव्हा राज ठाकरे 400 गाड्या घेवून तिकडे गेले. त्यावेळी एक अघडीत गोष्ट घडवण्याता कट आखण्यात आलेला”, असं संदीप देशपांडे म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us