‘त्यांचे सदाआवडते लोक आहेत, ते…’; वकील सदावर्तें यांच्यावरून ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन मागे घेतलं असून यासंदर्भात पत्रकार परिषद घेत माहिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर असल्याचं सांगत बंद करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश राज्य सरकारला दिले होते. या बंदविरोध सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती. याचाच धागा पकडत उद्धव ठाकरेंनी थेट फडणवीसांवर निशाणा साधला.

त्यांचे सदाआवडते लोक आहेत, ते...; वकील सदावर्तें यांच्यावरून ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
Harish Malusare | Updated on: Aug 23, 2024 | 8:05 PM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी 24 ऑगस्ट 2024 ला महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. मविआमधील सर्व नेत्यांनी या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलं होतं. या बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती. यावर तातडीने सुनावणी करत मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर असल्याचं सांगत जर कोणी बंद केला तर राज्य सरकारने कारवाई करावी असे आदेश दिले होते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत बंद मागे घेत असल्याचं सांगितलं. यावेळी ठाकरेंनी बंदविरोधात याचिका दाखल करणाऱ्या सदावर्तेंवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

खरंतर याचिकाकर्त्याने या कारणासाठी कोर्टात जायला नको होतं. जिथे आई बहि‍णींचा विषय येतो तिथे त्यांनी संवेदनशील व्हायला हवं होतं. आता उद्या जर कुणावर अत्याचार झाला तर त्याची जबाबदारी याचिकाकर्ते आणि कोर्टावर असेल. त्यांचे काही सदाआवडते लोक आहेत. ते नेहमी कोर्टात जातात आणि निर्णय घेऊन येतात. मागे मराठा आरक्षणाच्या विरोधातही ते गेले होते, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

बंद आम्ही उद्याच जाहीर केला होता. पवारसाहेब आणि पटोले बाहेर आहेत. त्यामुळे एकत्र बसून निर्णय घेऊ शकलो नाही. फोनवरून बोलणं झालं. पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. उद्या परवा आम्ही बसून चर्चा करू. भविष्यात बंद करणार नाही, असं नाही. संप करणं हा लोकशाहीचा अधिकार आहे. पुन्हा सांगतो, कोर्टाचा निर्णय मान्य नाही.पण कोर्टाचा आदर करून आम्ही निर्णय स्वीकारत आहोत. पण आम्ही बंद करणार नाही. आंदोलन करूनच स्वातंत्र्य मिळालं आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आंदोलन करायचं नाही. तेही महिलांविरोधातील अत्याचारांविरोधात आंदोलन करायचे नाही. हे काही पटत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

गावात आणि शहरातील मुख्य चौकात आघाडीचे नेते कार्यकर्ते तोंडाला काळ्या फिती लावून निषेध करतील. आम्ही तोंडच बंद करू. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही. मोर्चे हडताळ यावर बंदी आहे का. लोकांनी भावना व्यक्त करू नये का. यावर घटनातज्ज्ञांनी बोललं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us