महाशिवरात्रीचा उपवास बेतला असता जीवावर, नागपूरमध्ये 20 ते 25 जणांना विषबाधा
राज्यभरात महाशिवरात्रीच्या सणानिमित्त शंकराच्या मंदिरात भक्तांनी शंभू महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. मात्र सणाला गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे. नागपूरमध्ये अनेक नागरिकांना उपवासाच्या पदार्थामुळे विषबाधा झाली आहे.
नागपूर | राज्यसह देशभरात महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. महाशिवरात्रीच्या सणानिमित्त भोलेनाथाच्या भक्तांनी उपवास पकडले होते. हाच उपवास काहींच्या जीवावर बेतला असता, नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमधील त्रिमुर्तीनगर परिसरातील तब्बल 20 ते 25 जणांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. हे सर्व थालीपीठाच्या पीठामुळे झाल्याचं माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
नागपूरच्या त्रिमूर्तीनगर परिसरातील ही घटना घडली आहे. सर्वांनी उपवासाचे थालीपीठ म्हणून (श्री जी) चे भाजणी पीठ नेले. उपवासामध्ये थालीपीठ खाल्ल्यावर काही वेळाने उलटी, मळमळ आणि चक्करचा त्रास झाला. नेमका त्रास कशाने होत आहे हे काही समजलं नाही. मात्र त्रिमूर्तीनगरमधील सर्वच रूग्णालयामध्ये रूग्णांची संख्या वाढली. व्होकार्ड, पडोळे, अवंतीका, या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व रूग्ण दाखल झाले.
दरम्यान, अन्न व औषध विभागाने या घटनेची दखल घेतली असून कंपनीच्या मनुफॅक्चरिंग युनिट मधील खाद्य पदार्थांच्या कच्या मालाचे नमुने तपासण्यात घेतले आहेत. 20 दुकानांचे सॅम्पल मागवण्यात आले असून नेमकं कशामुळे नागरिकांना त्रास झाला याबाबत अन्न व औषध चौकशी करत आहेत. आता या खासजी कंपनीविरोधात अन्न व औषध विभाग काही कारवाई करतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, राज्यातील परभणीमधील गंगाखेड, पूर्णा आणि जिंतूर या ठिकाणी भगर खाल्ल्याने 98 जणांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. रूग्णालयामध्ये या भाविकांवर उपचार सुरू आहेत.