Nashik | 1971 च्या भारत-पाक युद्धात साळवेंनी जीवावर उदार होत सैनिकांचे वाचवले प्राण; कृषिमंत्री भुसेंकडून गौरवोद्गार
कृषिमंत्री भुसे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेंतर्गत महाराष्ट्राचे मूळ निवासी असलेल्या माजी सैनिक माजी सैनिकांच्या विधवांना, वीर जवानांच्या अवलंबितांना त्यांच्या नावे असलेल्या एका मालमत्तेवर कर माफी देण्यात आली आहे.
नाशिकः कचरू साळवे यांनी 1971 मध्ये झालेल्या भारत – पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्यांनी सहकारी सैनिकांचे प्राण वाचविले होते. देशासाठीचे त्यांचे हे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन शासनामार्फत त्यांना दोन हजार फुटांची जागा निवास बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील वर्षी 23 जानेवारीलाच साळवे यांचे कुटुंब नवीन घरात प्रवेश करेल, असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे (Dada Bhuse) यांनी व्यक्त केला. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे वीरचक्र पुरस्करार्थी कचरू साळवे यांच्या निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कृषिमंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, वीरचक्र पुरस्कार प्राप्त कचरू साळवे, कल्याणराव पाटील, माजी जि. प. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, सुनील पाटील, रतन बोरणारे, वसंत पवार, राजेंद्र लोणारी, दीपक लोणारी, प्रवीण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
मालमत्तेवर करमाफी
भुसे पुढे म्हणाले की, सैनिकाविषयी आदर कृतीतून व्यक्त करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. माजी सैनिक, शहीद कुटुंब यांच्या कार्याचे मोल होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शासन नेहमी प्रयत्नशील आहे. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेंतर्गत महाराष्ट्राचे मूळ निवासी असलेल्या माजी सैनिक माजी सैनिकांच्या विधवांना, वीर जवानांच्या अवलंबितांना त्यांच्या नावे असलेल्या एका मालमत्तेवर करमाफी देण्यात आली आहे. तसेच व्यावसायिक शिक्षणासाठी माजी सैनिकांच्या पाल्यांना 5 टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. औरंगाबाद येथील मुलांसाठी येणाऱ्या प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर नाशिक येथे मुलींसाठी सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत आहे, असेही यावेळी कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.
पुढील वर्षी बांधकाम पूर्ण
कार्यक्रमात पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ज्या सैनिकांच्या भरवशावर आपण सुखाची झोप घेतो, त्या प्रत्येक सैनिकांची आपण काळजी घेतली पाहिजे. तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने आजच्या शुभ दिवशी वीरचक्र पुरस्करार्थी कचरू साळवे यांच्या निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन आज करण्यात आले आहे, ही खूप आनंदाची बाब आहे. पुढील वर्षी ह्याच दिवशी गृहप्रवेश करण्यात यावा, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
इतर बातम्याः
Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!