‘त्या’ घटनेने रुपाली चाकणकर झाल्या भावूक, म्हणाल्या ‘छोट्या मैत्रिणींनो टोकाचं पाऊल नको, आम्ही सोबत आहोत’

आपल्या मुलींची, आपल भविष्य असणाऱ्या युवतींचीं काय चूक? त्या असं टोकाचं पाऊल का उचलतात? निराश का होतात? आपल्या आई वडिलांचा, कुटुंबाचा का विचार करत नाहीत.?

त्या घटनेने रुपाली चाकणकर झाल्या भावूक, म्हणाल्या छोट्या मैत्रिणींनो टोकाचं पाऊल नको, आम्ही सोबत आहोत
RUPALI CHAKANKAR
Mahesh Pawar | Updated on: Aug 24, 2023 | 7:37 PM

मुंबई : 24 ऑगस्ट 2023 | नाशिकमधील सिन्नर येथे एक दुर्दैवी घटना घडली. 3 तरूणांनी दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीसोबत टवाळखोरी केली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. त्या टवाळखोरांनी तिच्या वडिलांनाही धमकावले होते. त्या तणावातून विद्यार्थीनीने आपले जीवन संपवले. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही संशयित आरोपींना अटक केली. या घटनेमुळे व्यथित झालेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोशल मिडियावरून महिला आणि विद्यार्थीनीना आवाहन केले आहे. नाशिकच्या त्या घटनेची सविस्तर माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांकडून घेतली. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे असे सांगितले. फोन ठेवला आणि या आधी घडलेल्या अशाच काही घटना डोळ्यासमोर आल्या.

“मित्राने फोटो काढून ब्लँकमेल केले म्हणून काँलेजला जाणाऱ्या मुलीची आत्महत्या.” “पाठलाग करणाऱ्या तरुणाच्या जाचाला कंटाळून शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या.” अशा बातम्या बरेचदा वाचनात येतात आणि आता ही नाशिकची बातमी… अशा बातम्या पाहिल्यानंतर सर्वात आधी त्या आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे हीच भावना मनात येते, असे त्या म्हणाल्या आहेत.

राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करतो. पोलिस यंत्रणा, कायदा त्यांचे काम करेल. त्यांना शिक्षा होईलच. पण आपल्या मुलींची, आपल भविष्य असणाऱ्या युवतींचीं काय चूक? त्या असं टोकाचं पाऊल का उचलतात? निराश का होतात? आपल्या आई वडिलांचा, कुटुंबाचा का विचार करत नाहीत.? काही समाजकंटक त्रास देतात म्हणून आपल्या मुलींनी आयुष्य संपवावं हे बरोबर आहे का? कुणाच्या तरी चुकीची शिक्षा दुसऱ्याने आयुष्य संपवून स्वतः भोगावी का? असे अनेक प्रश्न पडले.

कदाचित या सगळ्यांची उत्तरे हा संवादाचा अभाव, विश्वासाचा अभाव यात आहेत. कुणीतरी त्रास देतय पण ते सांगायच कुणाला आणि सांगितल्यावर आपल्यावर विश्वास ठेवतील का? मुलगी म्हणून आपल्यालाच दोष देणार नाहीत कशावरुन अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांमुळे मुली बोलत नाहीत आणि कुणाशी बोलायला हवं हेही त्यांना कळत नाही हे ही कटु सत्य आहे.

 

अनेक गोष्टी तुमच्यासाठीच आहेत

माझं सर्व मुलींना सांगणे आहे, कुठलाही त्रास असेल तर बोला, सहन करत राहू नका. घरच्या माणसांना सांगा, तुमच अस्तित्व त्यांच्यासाठी मोलाचे आहे. कुठलाही टोकाचा निर्णय घेण्याआधी घरच्यांना सांगा. अशावेळी पालकांनी ही मुलींना समजून घेतलं पाहिजे. पोलिस यंत्रणा, भरोसा सेल, दामिनी पथक, वन स्टाँप सेंटर, १०९८ ही चाईल्ड लाई, १५५२०९ हा राज्य महिला आयोगाचा हेल्पलाईन नंबर अशा अनेक गोष्टी तुमच्यासाठीच आहेत.

आयुष्य संपवून देऊ नका

आम्ही सगळे तुमचं म्हणणे ऐकून घेऊ, तु मुलगी आहेस म्हणून हे असा पुर्वग्रह न ठेवता, कोणतही लेबल न लावता. आपल्या संवादातूनच आपल्याला मार्ग सापडेल. समाजकंटकांना शिक्षा द्यायचा आणि सन्मानाने, सुरक्षित जगण्याचा… कुणी तरी गुन्हा करतयं त्याची शिक्षा स्वतला देत आयुष्य संपवून देऊ नका.

मुलींनो लक्षात ठेवा, तुमची चुक नाही. तु निर्भय रहा, अन्याय सहन करु नको. आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटणारच त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जा. सन्मानाने जगण्याच्या या लढाईत आम्ही सोबत आहोत. आणि तुझ्या शालेय अभ्यासक्रमातली, सातवीला मराठीला शिकवली जाणारी कविता जस सांगते तसं जगा…

असे जगावे, छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला दयावे उत्तर !
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला दयावे उत्तर !
संकटासही ठणकावून सांगावे, ये आता बेहत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला दयावे उत्तर !

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us