मतदान संपलं तरी शाब्दिक चकमक सुरुच, करा हिशेब म्हणत ताईंचं दादांना आव्हान
बारामतीचं मतदान संपलं असलं तरी, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या बहिण भावातली शाब्दिक चकमक थांबलेली नाही. शरद पवारांचा मुलगा नाही, त्यामुळं संधी मिळाली नाही असं अजित पवार म्हणाले आहेत. त्यानंतर कोणाला जास्त संधी मिळाली याचा हिशेबच करा, असं प्रतिआव्हान सुप्रिया सुळेंनी दिलं आहे.
AJIT PAWAR VS SUPRIYA SULE : बारामतीत मतदान पार पडलं असलं तरी देखील दादा आणि ताई यांच्यात मात्र अजूनही शाब्दीक चकमक सुरुच आहे. अजित पवारांनी पुन्हा एकदा, पक्षाच्या नेतृत्वावरुन शरद पवारांवर निशाणा साधला. 80च्या वर वय झालं तरी संधी देत नाहीत. जर शरद पवारांचा मुलगा असतो तर मलाच संधी मिळाली असती, असं अजित पवार शिरुरमध्ये म्हणाले आहेत. जे अजित पवार बोललेत तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी TV9च्या मुलाखतीत म्हणाले आहेत. शरद पवारांच्या कुटुंबात वारस्यावरुन भांडण असल्याचं मोदींचं म्हणणं आहे.
शरद पवारांनी पुन्हा एकदा, भाजपसोबत जाण्याचा अंतिम निर्णय झाला नव्हता असं सांगून अजित पवारांच्या निर्णयाला विरोध केला. भाजपबरोबर जा असा निर्णय आमच्या पक्षात कधीही झाला नाही. माझ्यासमोर या चर्चा झाल्या मी कधीही नाही म्हणत नाही. चर्चा करणं म्हणजे निर्णय नाही. सर्व चर्चा केल्यानंतर सगळे मिळून अंतिम निर्णय घेतात. अमित शाह यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे राजकारण तुम्ही करत असाल तर राज्यातील जनता स्वीकारणार नाही. पुलोदचा प्रयोग आणि अजित पवारांचा प्रयोग यात बिलकूल साम्य नाही. त्यावेळी भाजप नव्हता, जनता पक्ष होता आणि तो पुलोदमध्ये होता.
भाजपसोबत बैठका करुनही शरद पवार पलटले पण मी शब्द पाळला. म्हणूनच पहाटेचा शपथविधीही केला असं सांगून. जे शरद पवार करणार होते तेच आपण केल्याचं अजित पवार वारंवार सांगत आहेत. तसंच चर्चेचा दिखावा करुन शरद पवार त्यांच्याच मनाचं करतात, अशी टीकाही अजित पवारांनी काका पवारांवर केली आहे.
भाजपसोबत जायचंच नव्हतं तर चर्चा का करत होते, असं अजित पवार म्हणत आहेत. पण चर्चा करणं म्हणजे अंतिम निर्णय नसतो असं शरद पवारांचं म्हणणं आहे. अर्थात शरद पवार त्याकडे स्ट्रॅटर्जी म्हणून बघतात. पण याच स्ट्रॅटर्जीमुळं आपली संधी हुकत चालल्याचं अजित पवार उघडपणे बोलूनही दाखवत आहेत.