Pune News | अभ्यासाचा हा पुणेरी पॅटर्न, संपूर्ण गावाने तयार केला, मग चर्चा तर होणारच

pune news | पुणे शहर नेहमी आपल्या वेगळेपणामुळे प्रसिद्ध आहे. यामुळेच 'पुणे तेथे काय उणे' म्हटले जाते. आता पुणे शहराचा नाही तर पुणे जिल्ह्यातील एका गावाने अभ्यासाचा पॅटर्न तयार केला आहे. या पॅटर्नची चांगली चर्चा रंगलीय.

Pune News | अभ्यासाचा हा पुणेरी पॅटर्न, संपूर्ण गावाने तयार केला, मग चर्चा तर होणारच
Jitendra Zavar | Updated on: Oct 07, 2023 | 5:02 PM

विनय जगताप, वेल्हा, पुणे | 7 ऑक्टोंबर 2023 : ‘पुणे तेथे काय उणे’ असे म्हणण्यामागे पुणे शहरातील वेगळेपण प्रसिद्ध आहे. मग पुणेरी पाट्या असो की पुणेरी खाद्यपदार्थ सर्वांची चर्चा होत असते. या सर्व बाबतीत पुणे शहरातील नाही तर एका गावाची चर्चा रंगली आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हा या तालुक्यातील गुंजवणे गावाने अभ्यासाचा पॅटर्न तयार केला आहे. या पॅटर्नची चर्चा सर्वत्र होत आहे.

काय आहे अभ्यासाचा पॅटर्न

पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात गुंजवणे हे गाव आहे. या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने अनोखा उपक्रम तयार केला आहे. अभ्यासाचा भोंगा असे उपक्रमाचे नाव आहे. या उपक्रमात सकाळी 6 आणि संध्याकाळी 6 वाजता गावात भोंगा वाजवला जाणार आहे. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासाला बसावे लागणार आहे. गाव आणि शाळेने मिळून हा नियम केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना अभ्यासाची सवय लागण्यासाठी हा फंडा तयार केलाय.

यावेळी पाच वेळा वाजणार भोंगा

गुंजवणे गावामध्ये कधी 3 वेळा भोंगा वाजवला जाईल. त्यावेळेस काहीतरी आपत्कालीन गोष्ट घडलेली असेल. तसेच गावामध्ये 5 वेळा दक्षतेचा भोंगा वाजणार जाईल. त्यादिवशी गावामध्ये कोणाचे तरी निधन झाले असेल. गावात राबविण्यात येत असलेल्या या अनोख्या उपक्रमाची परिसरामध्ये चर्चा सुरु आहे. या उपक्रमाचे उद्घाटन झाले.

प्रथमच असा उपक्रम

पुणे जिल्ह्यात अभ्यासाचा भोंगा हा उपक्रम प्रथमच राबवला गेला. त्यात भोंगा वाजल्यानंतर रोज दोन तास मुलांना अभ्यास करावा लागणार आहे. पहिलीपासून ते पदवीपर्यंतचे विद्यार्थी त्या वेळेत अभ्यास करतील. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हेमंत कांबळे यांनी सांगितले. या उपक्रमामुळे दूरदर्शन संच आणि मोबाईल यापासून विद्यार्थ्यांना त्या वेळेत मुक्ती मिळणार आहे.

असा असणार उपक्रम

संध्याकाळी सहा नंतर आठ वाजता भोंगा वाजेल तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास बंद करून जेवण करून आराम करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता भोंगा वाजेल तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी उठून सकाळची सर्व कामे करावी. तसेच शाळेत जाण्याची तयारी करावी. सलग पाच वेळा भोंगा वाजला तर गावामध्ये कोणाचे तरी निधन झाल्याचा संदेश त्यातून दिला जाईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us