Vasant More : …मग कोथरूडमध्ये तरुण पिढी नारळ पाणी पिण्यासाठी जाते का? वसंत मोरेंचा रोखठोक सवाल

Vasant More : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरुन राजकारण रंगलं आहे. पुण्यातील विविध पक्षीय नेते परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. "कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफमध्ये लागेबांधे आहेत, भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील" असा इशारा वसंत मोरे यांनी दिला.

Vasant More : ...मग कोथरूडमध्ये तरुण पिढी नारळ पाणी पिण्यासाठी जाते का? वसंत मोरेंचा रोखठोक सवाल
vasant more
| Updated on: May 23, 2024 | 10:46 AM

कोरेगाव पार्कमधील कल्याणी नगर येथे हिट अँड रनची जी घटना घडली, त्यावरुन आता पुण्यात राजकारण रंगलं आहे. पुण्यातील नेते परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याची सुरुवात काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी केली. “पुणेकरांच समाधान करण्याकरता देवेंद्र फडणवीस आले होते. या प्रकरणात तपास अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने तपास केला, त्याच्यावर आतापर्यंत कुठलीही कारवाई केली नाही हे फक्त दाखवण्यापुरता देखावा होता” असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्याला भाजपा नेते मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिलं. “लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच” अशी टीका मुरलीधर मोहोळ यांनी केली.

आता यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेल्या वसंत मोरे यांनी मत नोंदवलं आहे. “कोरेगाव पार्क मध्ये जो अपघात झाला, तो दुर्देवीच होता. पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते” असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. “नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या, त्या कोथरूडमधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावे” असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

‘तरुण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का?’

“सोबतच भुगाव, पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशीकडेही लक्ष द्यावे. तसेच ज्यांनी निवेदन दिली त्यांनी सुद्धा एन आय बी एम कोंढवा भागाकडे सुद्धा लक्ष द्यावे. नाहीतर असं म्हणावं लागेल कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते आणि वरील भागांमध्ये नाईट लाईफ साठी जाणारी तरुण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का?” असं वसंत मोरे म्हणाले.

‘जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असेल’

“कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफमध्ये लागेबांधे आहेत, भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही, तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील. पोलीस यंत्रणेने फक्त कोरेगाव पार्क टार्गेट न करता संपूर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी म्हणून जर कुठे हिंसक आंदोलन झाली तर त्याला संपूर्णपणे जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असेल” असा इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us