मोठी दुर्घटना, 48 विद्यार्थ्यांना घेऊन क्लासची पिकनीक निघाली, परतताना बोरघाटात काळाचा घाला

मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात एक मोठी आणि भीषण अपघाताची दुर्घटना घडलीय.

मोठी दुर्घटना, 48 विद्यार्थ्यांना घेऊन क्लासची पिकनीक निघाली, परतताना बोरघाटात काळाचा घाला
भीषण अपघात
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Dec 11, 2022 | 9:52 PM

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात एक मोठी आणि भीषण अपघाताची दुर्घटना घडलीय. चेंबूर येथून 48 विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झालाय. एका खासगी क्लासचे विद्यार्थी या बसने प्रवास करत होते. बसमधील विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह होता. आपल्यासोबत काही विपरीत घडेल याची त्यांना कल्पनासुद्धा नव्हती. अभ्यासापासून थोडं दूर, विरंगळा काढून, आयुष्य मस्त मजेत जगावं असा विचार करुन ते सहलीला गेले होते. पण त्यांच्यावर वाटेत काळाने घाला घातला. तब्बल 48 विद्यार्थ्यांनी भरलेली बस बोरघाटात पलटी झाली आणि हाहाकार उडाला.

मुंबईच्या चेंबूर येथून ही बस मावळसाठी निघाली होती. ही बस मावळ येथील ‘वेट न जॉय’ या थीम पार्कमध्ये गेली होती. मावळ येथून परतत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. या अपघातामुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडालीय.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झालंय. प्रशासनाकडून सर्व जखमी रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येतंय. या संकटापासून सर्व विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका व्हावी यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी विध्यार्थ्यांना खोपोलीतील सरकारी आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. खोपोली पोलीस, IRB यंत्रणा ही सर्व टीम अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी काम करत आहे.

दरम्यान, या घटनेत आतापर्यंत किती विद्यार्थी जखमी झालेत याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.