दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन, अनेक ठिकाणी दमदार पाऊस
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये विश्रांती घेतली होती. मात्र, कालपासून (20 जुलै) मराठवाड्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे दुष्काळाचे सावट असलेल्या मराठवाड्याला थोडा दिलासा नक्कीच मिळाला आहे.
औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये विश्रांती घेतली होती. मात्र, कालपासून (20 जुलै) मराठवाड्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे दुष्काळाचे सावट असलेल्या मराठवाड्याला थोडा दिलासा नक्कीच मिळाला आहे. मराठवाड्यात 21 , 22, 23 आणि 24 जुलैला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली होती. त्यानुसार, मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे.
मान्सूनचा पहिला पाऊस चांगला बरसला. त्यानंतर पावसाने उसंती घेतली. यंदातरी चांगला पाऊस होईल या अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, पावसाने दुष्काळग्रस्त मराठावाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राकडे पाठ फिरवली आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली. पावसाअभावी शेतातील पीकंही करपली. त्यामुळे या भागात कृत्रिम पाऊस पाडण्यात येईल अशी घोषणा कृषी मंत्र्यांनी केल्या. त्यासाठीच्या हालचालींनाही वेग आला. मात्र, आता पावसाचे पुनरागमन झाल्याने कदाचित कृत्रिम पवसाची गरज भासणार नाही.
मराठवाड्यात औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. औरंगाबाद शहरात 18 .4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच, जालना शहरासह अंबड, घनसावंगी , बदनापूर, तालुक्यातही पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तर नांदेड जिल्ह्यातील चार तालुके वगळता उर्वरित ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला. बीड जिल्ह्यातही एक दोन तालुके वगळता पावसाने दमदार हजेरी लावली. हिंगोलीसह वसमत तालुक्यात सर्वदूर पवसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले असले, तरी शेतकऱ्यांना मोठया पावसाची प्रतिक्षा आहे.
VIDEO :