सातारा | 06 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात विरोधकांकडून नरेंद्र मोदी आणि भाजपवर गंभीर आरोप होताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सध्या देशभरात मोदी की गॅरंटी अशी केंद्रातून जाहिरात सुरू आहे. ही जाहिरात केंद्र सरकारच्या नावाने केली तर आपण समजू शकतो. मात्र मोदी एक उमेदवार आहेत त्यांचा प्रचार सरकारी पैशाने करणे हे योग्य नाही. याविषयी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवणार आहोत. याविषयी कारवाई होईल का नाही माहित नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
निवडणुकीचे संचालन करणारी सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग… मात्र कुठल्याही यंत्रणेला स्वायत्त काम करून द्यायचं नाही. आपल्या दावणीला बांधल्यासारखं या यंत्रणांचा वापर करायचा. रशिया चीन मध्ये जशी घटना बदलली गेलीय आता भारतात काम केलं जातंय, यामुळे महागाई बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार हे राष्ट्रीय पातळीवरचे प्रमुख इंडिया आघाडीचे मुद्दे असणार आहेत, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामुळे कर्नाटक आणि तेलंगणाची निवडणूक यशस्वी झाली आहे. महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत त्या सर्व नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. यामध्ये स्थानिक नेत्याचा समावेश नाही. नेत्यांना धमकी देऊन पक्षांतर करायला भाग पाडणं, तुरुंगात टाकायचं चार शीट फाईल करायची नाही. यासाठी सावध राहण्याची गरज आहे, असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.
महाराष्ट्र हे दोन नंबरचं राज्य आहे. या ठिकाणी पक्षांना फोडायचं आणि विरोधी पक्षात काही दम राहिला नाही, असं सांगायचं काम सत्ताधारी करत आहेत. मात्र जनतेला आमचं आवाहन आहे की, आमच्या राजकीय पक्षांच्या जरी काही चुका झाल्या असतील तर त्याची शिक्षा भारताच्या जनतेला आणि भावी पिढीला देऊ नका. ही निवडणूक जनतेने हातात घेण्याची गरज आहे. संविधान वाचवण्याचे गरज आहे. आमच्या अपयशाची शिक्षा भावी पिढीला देऊ नका, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीला आवाहन केलं आहे.