अजितदादा गटाचे आणि शिंदे गटाचे उमेदवार लढतील, पण चिन्ह कमळ असेल; बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
Bacchu Kadu on Mahayuti Loksabha Election 2024 : बैठकीचं आमंत्रण आलं तरी जायची इच्छा नाही...; बच्चू कडू काडीमोड करण्याच्या तयारीत? बच्चू कडू नेमकं काय म्हणाले? लोकसभा निवडणूक आणि जागावाटपाच्या बैठकीवर बच्चू कडू यांनी काय मत व्यक्त केलं? वाचा सविस्तर...
स्वप्नील उमप, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, अमरावती | 06 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. जागावाटप, उमेदवारीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. जागावाटपाबाबत महायुतीच्याही बैठका होत आहेत. अशातच आमदार बच्चू कडू यांनी महत्वाचं विधान केलंय. लोकसभा निवडणूक आमच्यासाठी दुय्यम आहे. विधानसभा निवडणूक आमच्यासाठी प्रथमस्थानी आहे. विधानसभेची बोलणी नाही तर मग लोकसभेच्या 400 च्या पार वाट्यात आमचा काय संबंध येतो? महायुतीच्या बैठकींचं मला आमंत्रण आलं नाही आणि आमंत्रण आलं तरी जायची इच्छा नाही, असं बच्चू कडू म्हणाले.
“शिंदे, अजितदादांचे उमेदवार लढतील पण…”
अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर आणि जागावाटपावर बच्चू कडू यांनी भाष्य केलंय. आमची राजकीय बांधिलकी कोणासोबतच नाही. महाराष्ट्रात सगळ्याच जागा भाजप लढू शकतो. एकनाथ शिंदे गटाचे आणि अजित दादा गटाचे उमेदवार राहतील. पण चिन्ह कमळ राहील. शिंदे साहेबांची शिवसेना दिसली पाहिजे. तुम्ही जर त्यांना काखीत दाबून ठेवल तर बिचवा काढायची वेळ आली नाही पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले. सध्या लोकसभा निवडणूक लढवण्याची आमची मानसिकता नाही. आमची मानसिकता विधानसभेची फक्त अमरावती किंवा अकोलामध्ये निवडणूक लढू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
राणांना धमकी, बच्चू कडू म्हणाले…
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून जीवे मारण्याती धमकी आली आहे. नवनीत राणा यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमकीवर बच्चू कडू यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. नवनीत राणा यांना धमकी देणाऱ्यांना पाकिस्तानातून अफगाणिस्तानमधून ओढून आणलं पाहिजे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून नवनीत राणांना धमकी येत असेल तर मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह आहे. मोदींच्या सरकारमधील खासदाराला जर धमकीत असेल तर मग कायदा कुठे राहिला? निवडणुका आहे म्हणून एका धर्माला टार्गेट केलं जातं. निवडणुका जवळ आहे तर हिरवा येईल भगवा येईल निळा झेंडा बाहेर येईल, असं बच्चू कडू म्हणाले.