‘जय शाह यांचा मला फोन, शिंदे माझी प्रॉपर्टी घेतील का?’, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

| Updated on: Mar 06, 2023 | 12:04 AM

जय शाह यांनी आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझी संपत्ती तर चोरुन नेणार नाही ना? असा प्रश्न विचारला, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

जय शाह यांचा मला फोन, शिंदे माझी प्रॉपर्टी घेतील का?, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा
Follow us on

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी आपल्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे चिरंजीव जय शाह (Jay Shah) यांचा फोन आल्याचा दावा केला. जय शाह यांनी आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझी संपत्ती तर चोरुन नेणार नाही ना? असा प्रश्न विचारला, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केली. त्यांच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उत्तर दिलं आहे.

“अमित शाह पुण्याला येऊन गेले आणि मला जय शाहचा फोन आला. उद्धवजी आपण कसं करणार, मी टेन्शनमध्ये आहे. मी म्हटलं, काय झालं जय भाई? म्हणाला, काल यांनी तुमच्या वडिलांचा फोटो चोरला. आता म्हणत आहेत की अमित शाह मला वडिलांसारखे. त्यामुळे माझी प्रॉपर्टी घेतील की काय? घाबरु नकोस. त्यांना सवय आहे. दोन-चार दिवसात आणखी नावं वाढतील. आज हा वडिलांसारखा तो वडिलांसारखा. अरे काय लाज-लज्जा, शरम तरी ठेव. हे राजकीय किंवा वैचारिक वांझोटेपणाचं लक्षण आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

‘रोजचा थयथयाट सुरु’, शिंदेंची टीका

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “आता त्यांचा रोजचा थयथयाट सुरु आहे. त्यांनी फक्त जागा बदलेली आहे. त्यांना आरोप-प्रत्यारोप केल्याशिवाय दिवस जात नाही. त्याशिवाय त्यांना चैनही पडत नाही. त्यामुळे त्यांनी आरोप करावेत, आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ”, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. “त्यांच्याकडून नेहमी शिवसेना-भाजप महायुती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्याचा एकच कार्यक्रम सुरु आहे. त्यांना आरोप करु द्या”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“उद्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना देशभक्ताची उपमा देऊ नये, एवढंच मला सांगावसं वाटतं. तेही असं करायला मागे-पुढे पाहणार नाहीत. कारण महाराष्ट्रात जो बदल घडलाय, केंद्र आणि राज्य सरकारडून विकासाची जी कामे सुरु आहेत त्यामुळे अतिशय पोटदुखी सुरु झालेली आहे. त्याचाही इलाज आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखान्यामध्ये ठेवलेला आहे”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला.

“दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय. आमचं काम पाहून विरोधकांच्या छातीत धडकी भरलेली आहे. कसब्यातील पोटनिवडणुकीचा एका विजयाने ते एवढे हुरळून गेले आहेत की त्यांना वाटतं की आता राज्य आणि देशामध्ये बदल घडेल. पण त्याचबरोबर तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष जिंकला हे त्यांना दिसत नाही. यापूर्वीदेखील बदलाचे वारे वाहून गेले असा अंदाज व्यक्त केला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जागा महायुतीला विजय मिळेल आणि सर्व विरोधकांचा धुव्वा उडेल”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

उद्धव ठाकरे काय-काय म्हणाले?

“काल परवा मिंदे बोलले की बरं झालं आमचं देशद्रोह्यांसोबत चहापान टळलं, मग सगळ्यांनी धुडगूस घातला. मग म्हणाले, तसं नाही. मी तुम्हाला उद्देशून बोललो नाही. अरे कसं बोलशील? बोललास तर आम्ही जीभ हासडून टाकू. कारण आम्ही देशद्रोही नाही आहोत. देशप्रेमी आहोत. मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, मी मिंदेंना बोलतोय. राजव, वैभव, अनिल परब देशद्रोही आहेत? मुंबई वाचवणारे सैनिक आज तुम्हाला देशद्रोही वाटत आहेत?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

“महाविकास आघाडी सरकार चांगल चाललं होतं. मग बिघडलं कुठे? माशी शिंकली कुठे? माशी एकाच ठिकाणी शिंकली, आज जसं राजन साळवी, बाकीचे आपले आमदार आहेत, नितीन देशमुख यांनी तर भर सभेत सांगितलं की, कसा त्यांचा छळ केला, अनिल परब आहेत, एक तोतरा येतो हातोडा घेऊन, खरा हातोडा तुला पेलेल का? आता स्वत:च्या डोक्यावर पडायची वेळ आलीय. पण छळायचं. राजन साळवींच्या घरी धाड. घराचं मोजमाप घेतात, किती फूट बाय किती फूट, आता परत 13 की 15 तारखेला कुटुंबियांना बोलावलं आहे. राजन साळवी का देशद्रोही आहेत?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

“जे भुरटे आहेत, चोर आहेत, गद्दार, तोतया आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही शिवसेना नाव चोरु शकाल असं तुम्हाला वाटत असेल. पण तुम्ही शिवेसना नाही चोरु शकत. धनुष्यबाण तुम्ही कदाचित चोरला असेल पण तो तुम्हाला पेलवेल असं अजिबात नाही. धनुष्यबाण घेऊन रावण उताणा पडला. मग मिंदे काय उभा राहणार?”, असा घणाघात त्यांनी केला.

“गोळीबार मैदान. मैदानाचं नाव खूप चांगलं आहे. पण मला शिवसैनिकांनी एक शिकलंय. ढेकण्या चेहऱ्याला गोळीबाराची गरज नसते. ढेकणं आपलं रक्त पिवून फुगलेली आहेत. त्यांना चिरडण्याची ताकद तुमच्या एका बोटामध्ये आहे. मतदानाच्या दिवशी एक बोट या ढेकण्यांना चिरडणार आहे. तोफेची काय गरज आहे? या तोफा आहेत ना. मुलखमैदान तोफा आहेत. आज सुद्धा दोन-तीन तोफा गडाडल्याच ना. भास्कर जाधव, गिते आहेत, सुषमा अंधारे आहेत. संजय कदम आता आणखी एक तोफ आपल्यासोबत आलेली आहे. पण तोफा या देशद्रोह्यांविषयी वापरायच्या असता”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“दुर्देवं असं की ज्यांना आपण कुटुंबीय मानलं. ज्यांना मोठं केलं. त्यांनीच आपल्या आईवर वार केलाय. होय, शिवसेना ही आपली आई आहे. शिवसेना ही चार अक्षरं नसती तर तुम्ही-मी कोण होतो? आज जे टिमक्या वाजवत आहेत की, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. तुमचा जन्म तेव्हा कदाचित झाला असेल, मुंबईनंतर पहिला भगवा इथे फडकला होता”, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढली.

“तुम्हाला तुमचा गर्व असेल की, आम्ही शिवसेना बांधली तर घ्या स्वीकारा आव्हान, शिवसेना नाव बाजूला ठेवा. तुमच्या आई-वडिलांचा नाव लावा जर त्यांना तुमची लाज वाटत नसेल तर आणि पक्ष बाधून दाखवा. मी तर उघडपणे बाहेर पडलो आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे”, असं आव्हान त्यांनी दिलं.

“ज्या तत्वावर शिवसेना त्यांची असं म्हटलं आहे ते तत्वच झूठ आहे. शिवसेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी केलेली नाही तर माझ्या वडिलांनी केलेली आहे. निवडणूक आयुक्तांचे वडील कदाचित त्या ठिकाणी बसले असतील पण ते तुमचे वडील असतील माझे वडील नाहीत”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.

“जे शिवसेना तोडण्याचा फोडण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न करत आहात त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही नेमकं काय करताय ते तुम्हाला लक्षात येत नाहीय. तुम्ही शिवसेना फोडण्याचा प्रयत्न नाही तर तुम्ही मराठी माणसाच्या एकजुटीवर घाव घालण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही हिंदूंच्या एकजुटीवर घाव घालण्याचा प्रयत्न करत आहात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“ज्यांना आजपर्यंत जे जे शक्य होईल ते दिलं, तुम्ही सगळ्यांनी मोठं केलं तरीसुद्धा ते खोक्यांमध्ये बंद झाले. माझ्या हातात आज काही नाही. माझे हात आज रिकामे आहेत. मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. पण तरीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत आलेला आहात. याच्यासाठी पूर्वजांची पुण्यायी असावी लागते. आज मी तुमच्याकडे आलेलो आहे. तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. तुमची साथ-सोबत मला पाहिजे”, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.