पुन्हा शुल्क भरायचे का? पुन्हा नोंदणी करावी लागणार का? TETचा पेपर फुटताच सरकारचा मोठा निर्णय

TET परीक्षेचा पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. उद्या टीईटी परीक्षेचा पेपर होणार होता, मात्र हा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. आता यानंतर सरकारने कोणता मोठा निर्णय घेतला आहे तो पाहा...

पुन्हा शुल्क भरायचे का? पुन्हा नोंदणी करावी लागणार का? TETचा पेपर फुटताच सरकारचा मोठा निर्णय
tet paper leak
| Updated on: Jun 27, 2026 | 3:11 PM

ठाण्यातून आज एक मोठी बातमी समोर आली ती म्हणजे TET परीक्षेचा पेपर फुटल्याची. उद्या टीईटी परीक्षेचा पेपर होणार होता, मात्र हा पेपर फुटल्याची माहिती समोर आल्यामुळे आता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2 लाख 26 हजार शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते, पुढील तारीख कधी जाहीर होईल याची अजून कल्पना नाही.  TET चा पेपरफुटल्याने आता वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे.  गृहराज्यमंत्री , शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर TET परीक्षेचा पेपर फुटल्या प्रकरणावर म्हणाल्या की, “टीईटी परीक्षा पारदर्शक पद्धतीने यानंतर घेण्यात येईल. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्याकरिता उद्याची परीक्षा रद्द करण्यात आली पुढे ढकलण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा ही 28 जून रोजी घेण्यात येणार होती त्यामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातल्या 1028 केंद्रांवरील परीक्षा होणार होती. ही परीक्षा अतिशय सुरक्षित पद्धतीने पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे याची खबरदारी महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आली होती कारण आपण बघितलं की नीटचा पेपर मागे त्यावेळी लीक झाला होता. सर्व उपाययोजना महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेच्या वतीने करण्यात आली परंतु काल मात्र काही अनोळखी इसमांकडे अशा पद्धतीचे पेपर आढळून येत असल्याची माहिती भिवंडी परिसरातल्या पोलिसांना त्या ठिकाणी मिळाली. तात्काळ आमच्या गृह विभागाच्या पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी पकडलं आणि सदर पेपर हा टीईटी संबंधीने महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेने तयार केला होता त्यांचाच आहे काय हे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कन्फर्म केलं ती माहिती त्या ठिकाणी प्राप्त झाली. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्याकरिता उद्याची परीक्षा रद्द करण्यात आली पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि पारदर्शक पद्धतीने ही परीक्षा यानंतर घेण्यात येईल.

टिईटी पेपरफुटी प्रकरणावर परिक्षा परिषद उपायुक्त प्रिया शिंदे म्हणाल्या की,” परीक्षा परिषदेच्या पेपर फुटी नंतर एकाही विद्यार्थ्यांचे शुल्क घेतलं जाणार नाही. पुर्ननोंदणी करण्याची गरज नाही. जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, तिघांवरती गुन्हा दाखल आहे पुढील तपास पोलीस करत आहेत. परीक्षा परिषद पुणे आयोजित परीक्षा ठाणे भिवंडी येथे प्रश्नपत्रिका लीग झाल्याची माहिती समोर आली. 37 ठिकाणी परीक्षा होणार होती. 1728 परीक्षा केंद्र होते. सहा लाख 125 उमेदवार परीक्षा देणार होते. पेपर फुटी नंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकर परीक्षा कधी होणार आहे याचं नियोजन लवकर कळवू. सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशी अंतिम निष्पन्न होईल त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी तीन आठवड्यांची प्रक्रिया असते. ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा उमेदवारांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता असणार नाही. यामध्ये उमेदवारांचा दोष नाही. पुन्हा रजिस्ट्रेशन फी आकारणार नाही.”

शिक्षण तज्ञ तथा अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.  ते म्हणाले की, “नीट पाठोपाठ आता TET चा पेपर फुटला. माध्यमांनी बातम्या शोधायच्या आणि तज्ञांनी मत मांडायची. समाजाने वैतागायच आणि सरकारने चौकशीची भाषा बोलायची आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा अभ्यास करायचा हे किती चालणार. यामुळे विद्यार्थांचा परीक्षेवरचा विश्वास उडतोय हा गंभीर प्रश्न आहे. स्पर्धा परीक्षा हे एकच माध्यम तरुणांसाठी उपलब्ध आहे आणि कितीही घटना घडल्या तरी जबाबदारी निश्चित होत नाही. इतके आंदोलन होऊन केंद्रीय शिक्षणमंत्री अजून राजीनामा देत नाही. केवळ रेल्वे अपघात झाला तर लालबहादुर शास्त्रींनी राजीनामा दिला होता त्यामुळे प्रतिक्रिया न देणे हीच मोठी प्रतिक्रिया ठेवावी अस माझं मत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us