Kalyan Protest : कल्याण-नगर महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, कांबा गावात गोविंदा पथकाचे अनोखे आंदोलन
काही दिवसापूर्वीच ज्येष्ठ शिवसैनिक नारायण भोईर यांचा सुद्धा या खड्ड्यांमध्ये पडून मृत्यू झाला होता. तरीसुद्धा अद्याप त्यांच्या घरी एकही प्रशासकीय अधिकारी यांनी जाऊन भेट दिलेली नाही. त्यांना कोणत्याच प्रकारची मदत झालेली नाही.
कल्याण : रस्स्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात कल्याण-नगर महामार्गावरील कांबा गावात गोविंदा पथका (Govinda Pathak)ने अनोखे आंदोलन (Protest) केले. खड्डे बुजवण्यासाठी शिव नवतरुण गोविंदा पथकाने भर रस्त्याच्या खड्यात चार थराचा मानवी मनोरे रचत प्रशासनाचा निषेध केला. महामार्गावरील खड्डे (Pothole) लवकरात लवकर बुजवावे. तसेच या खड्ड्यात मृत्यू झालेल्या नारायण भोईर यांना लवकरात लवकर प्रशासकीय मदत मिळावी, यासाठी गोविंदा पथकाचा उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. अहमदनगर महामार्गाची कल्याणजवळील म्हारळ ते कांबा या दरम्यान अक्षरश: चाळण झाली आहे. दूध, फळभाज्या यांच्यासह प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला हा रस्ता वर्षांतून सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ खड्डेमय असतो.
खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ
वाहन चालक आणि रस्त्याच्या शेजारी राहणाऱ्या म्हारळ, वरप, कांबा यांसारख्या गावातील रहिवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे व चिखलाचे साम्राज्य असल्यामुळे येथे शेकडो अपघात होतात. काही दिवसापूर्वीच ज्येष्ठ शिवसैनिक नारायण भोईर यांचा सुद्धा या खड्ड्यांमध्ये पडून मृत्यू झाला होता. तरीसुद्धा अद्याप त्यांच्या घरी एकही प्रशासकीय अधिकारी यांनी जाऊन भेट दिलेली नाही. त्यांना कोणत्याच प्रकारची मदत झालेली नाही. ठेकेदारावर आणि प्रशासकीय अधिकारी सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा स्थानिकांची मागणी आहे. तरीसुद्धा अजूनपर्यंत त्यांचावर कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही.
खड्डे न बुजवल्यास उग्र आंदोलनाचा इशारा
म्हारळ पाडा ते पाचवामैल हे अंतर जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतराचे असेल. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी अर्धा तास लागतो आणि संध्याकाळी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वारंवार स्थानिक रहिवाशी सामाजिक कार्यकर्त्यांकडून अनेक तक्रारी देऊनही प्रशासन लक्ष देत नसल्याने संतप्त झालेल्या या महामार्गावरील कांबा गावातील शिव नवतरुण गोविंदा पथकाने आज या महामार्गाच्या खड्ड्यामध्ये चार घरांचा मानवी मनोरा उभा केला. तसेच खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या नारायण भोईर यांना लवकरात लवकर प्रशासकीय मदत मिळावी व महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावे अशा प्रकारचे पोस्टर हातात घेऊन सलामी दिली. प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवले नाही तर उग्र आंदोलनाचा इशाराही या गोविंदा पथकाने दिला आहे. (Govinda pathak unique movement in Kamba village on Kalyan-Nagar highway)