कल्याण : महापालिकेच्या शाळा सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्याप या शाळामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक साहित्य (Educational Material) उपलब्ध झालेले नसल्याने आज त्रस्त पालक विद्यार्थ्यांनी माजी नगरसेवक कैलास शिंदे (Kailas Shinde) यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा (Morcha) काढला. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुविधाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांनी शाल आणि श्रीफळ देत प्रतिकात्मक सत्कार करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याबाबत बोलताना पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी शैक्षणिक साहित्यासाठी निधीची तरतूद करत तातडीने साहित्य खरेदीसाठी ठेकेदार नियुक्तीच्या सूचना दिल्या आहेत. लवकरात लवकर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 54 शाळांमध्ये सुमारे 6 हजार 500 विद्यार्थी शिकत असून हातावर पोट असलेल्या गरीब मजूर, रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिलांची मुले या शाळामध्ये शिक्षण घेतात. या पालकांची विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याची आर्थिक क्षमता नसते. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेतून मिळणाऱ्या शैक्षणिक साहित्यावर शैक्षणिक वाटचाल करावी लागते. पालिकेच्या शाळा सुरु होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. यामुळे आज कैलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी व पालकांनी मिळून कल्याण कचोरी गाव ते सदानंद चौक पर्यंत निषेध व्यक्त करत बालिका व शिक्षण मंडळाच्या विरोधात नारेबाजी करत शिक्षण विभागावर मोर्चा काढला. यावेळी गरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या शिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांनी शाल श्रीफळ देत प्रतिकात्मक सत्कार करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र मोर्चाची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी निघून गेल्याने कर्मचाऱ्यांनाच या मोर्चेकऱ्यांना सामोरे जावे लागले. (Municipal school students and parents protest against education department in Kalyan)