कॉलर सकाळी उडो की संध्याकाळी, कॉलर… उदयनराजे यांचा विरोधकांवर बेधडक हल्लाबोल
शरद पवार यांना कोणतीच सिंपथी नाही. असती तर ती दिसली असती. शरद पवार यांचा पक्ष साडे तीन जिल्ह्यात आहे. चार नाही, 40 सभा घ्या. हवं तर टेबल आम्ही देतो. इथलं समीकरण चांगलं आहे. सहाच्या सहा जागा भविष्यात महायुतीच्याच निवडून येतील. एका बाजूला शिष्टाचार आणि दुसऱ्या भ्रष्टाचार आहे. लोकांनी काय हवं ते निवडावं, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी साताऱ्यात जाऊन कॉलर उडवली होती. त्यानंतर भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनीही कॉलर उडवली. उदयनराजे यांनी कॉलर उडवल्यानंतर त्यांनी सकाळी उडवली की संध्याकाळी असा सवाल शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. आव्हाड यांच्या या टीकेचा उदयनराजे भोसले यांनी समाचार घेतला आहे. माझ्या कॉलरवर त्यांचं प्रेम आहे. त्यांनी कॉलर उडवून मला आताच निवडून दिलं पाहिजे, असं संकेत दिले आहेत, असं उदयनराजे म्हणाले. तसेच कॉलर सकाळी उडवतो की संध्याकाळी… कॉलर, कॉलर आहे, शर्टला कॉलर आहे, कुर्ता, पायजमाला कॉलर आहेच ना? असा टोला उदयनराजे यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला.
उदयनराजे भोसले यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी हा निशाणा साधला. शरद पवार यांनी कॉलर उडवून माझी नक्कल केली. चांगलं आहे ना? उदयनराजे करेक्ट वागतात. माझं अनुकरण शरद पवार करतात. आमच्या कॉलरमध्ये दम आहे. माझ्या कॉलरमध्ये दम नसता तर त्यांनी अनुकरण केलं नसतं, असं उदयनराजे म्हणाले.
त्यांचे आंबटचाळे
मागच्यावेळी शरद पवार पावसात भिजले आणि निवडणुकीचं चित्र बदललं. त्याबाबत उदयनराजे यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. ते भिजले म्हणून मी हरलो नाही. चूक माझी झाली, यांचे आंबटचाळे मला पटत नव्हते. उदयनराजे यांचा घरचा आहेर ही हेडलाईन मीडियानेच चालवली. जेव्हा राजीनामा दिला तेव्हा माझ्याकडून घाई झाली, मी विचारविनिमय करायला हवा होतं. जर तसं केलं असतं तर मी जिंकलो असतो, असं उदयनराजे म्हणाले.
ही महाभकास आघाडी
कालच्या सभेला चांगला प्रतिसाद होता. लाखाच्यावर लोक आले होते. कालच्या सभेला विजयी सभाच म्हणावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची तुलना होऊच शकत नाही. मोदींचा पक्ष राष्ट्रीय आहे. तर शरद पवार यांचा पक्ष प्रादेशिक आहे. मोदी म्हणजे स्थिरता. मविआ आघाडीतच स्थिरता नाही. ते स्वप्नलोकात वावरत आहेत. त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे ही निवडणूक डळमळीत आहे. महाविकास आघाडी नाही, ही तर महाभकास आघाडी आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.
भारतरत्न द्यावा असं तेव्हा का वाटलं नाही?
सातारा हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारा पट्टा आहे. त्यांना भारतरत्न देण्यासाठी दिल्लीत पाठपुरावा सुरू आहे. त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. मी यांच्यासारखी पोकळ घोषणा करत नाही, यांनी वाद घातला. आताच भारतरत्नची मागणी का केली? तुम्ही तर यशवंतरावांच्या नावाचा वापर करत आलात, तुम्ही का दिला नाही भारतरत्न? तुम्हाला पद्मविभूषण पुरस्कार मिळाला तेव्हा मानस पित्याला भारतरत्न मिळावा असं का वाटलं नाही?, असा सवाल त्यांनी केला.
तर सातारा भ्रष्टाचारी जिल्हा…
एपीएमसीत शशिकांत शिंदे यांनी घोटाळा केलाय. त्यांना मत म्हणजे साताऱ्याला भ्रष्टाचारी जिल्हा घोषित करावा लागेल, द्या त्यांना मत. काल ओढूनताणून लोकं आणली होती. भर उन्हात लोकांना आणलं होतं. मी माथाडींसाठीही काम करणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.