मुंबईकर तणावाखाली, आत्महत्यांमध्ये 7.4 टक्क्यांनी वाढ
स्थानिक पेलिसांनी केलेल्या तपासात या सर्व घटनांमागे तणाव हे मुख्य कारण असल्याचं दिसून आलं. त्याशिवाय, बेरोजगारी, असुरक्षित भविष्य, प्रेम संबंध हे आत्महत्या करण्यामागील मुख्य कारणं असल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : शहरात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या चारकोप परिसरातील रॉक अॅव्हेन्यू इमारतीत राहणाऱ्या 40 वर्षीय डिंपल वाडिलालने नोकरी नसल्याने इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. त्याआधी एका 22 वर्षीय अज्ञात तरुणीने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ठाण्याच्या स्कायवॉकवरुन उडी घेत आत्महत्या केली. 12 दिवसांपूर्वी 21 वर्षीय तरुणीने प्रियकरीकडून लग्नासाठी नकार दिल्याने गळफास लावून घेतला.
स्थानिक पेलिसांनी केलेल्या तपासात या सर्व घटनांमागे तणाव हे मुख्य कारण असल्याचं दिसून आलं. त्याशिवाय, बेरोजगारी, असुरक्षित भविष्य, प्रेम संबंध हे आत्महत्या करण्यामागील मुख्य कारणं असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या या दाव्याला मानसोपचार तज्ज्ञांनीही समर्थन दिलं आहे.
चारकोपच्या रक्षा रुग्णालयातील एमडी डॉक्टर प्रणव काबरा यांच्यामते, योग्य वेळी जर पिडीत लोकांची समजूत काढण्यात आली, तर त्यांचा जीव वाचवला जाऊ शकतो. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, मुंबईत आत्महत्या करण्यांमध्ये 7.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर भारतात जास्तकरुन 15 ते 29 वर्ष वयोगटातील तरुण-तरुणी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत.
आत्महत्या रोखण्यासाठी जनजागरुती गरजेची
वडाळ्यात तीन वर्षांपूर्वी एक वकील तरुणी 18 व्या मजल्यावरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, पोलीस निरिक्षक शालिनी शर्मा यांनी त्या तरुणीची तब्बल चार तास समजूत काढत तिला आत्महत्या करण्यापासून रोखलं. या घटनेरपासून प्रेरणा घेत मुंबई पोलिसांनी सध्या तणावाखाली असलेल्या लोकांसाठी जनजागृती अभियान सुरु केलं आहे.
मुंबईचे वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांच्या मते, आर्थिक असुरक्षितता, शिक्षणाचा तणाव, प्रेमात विश्वासघात आणि व्यसन इत्यादी गोष्टी तरुणांना आणि विद्यार्थांना आत्महत्या करण्याच्या मार्गावर घेऊन जातात. त्यामुळे अशा लोकांना काऊंसलिंगची अत्यंत गरज असते. त्यामुळे ते तणावातून बाहेर येऊ शकतात आणि त्यांचा जीव वाचवला जाऊ शकतो.