मुंबई-ठाण्यात शाळा कॉलेजांना सुट्टी, परीक्षाही रद्द
हवामान विभागाने मुंबईसह, नवी मुंबई, पालघरमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई-ठाण्यातील शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय मुंबई विद्यापीठातंर्गत घेण्यात येणार परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहे.
मुंबई : गेल्या पाच दिवसापासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी तुंबले. त्यामुळे मुंबईतील रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. तर मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखणाऱ्या रेल्वेच्या तिन्ही लाईन्स ठप्प झाल्या आहेत. दरम्यान हवामान विभागाने मुंबईसह, नवी मुंबई, पालघर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई-ठाण्यातील शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय मुंबई विद्यापीठातंर्गत घेण्यात येणार परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहे.
मुंबईसह राज्यात गुरुवार (27 जून) पासून पावसाला सुरुवात झाली. मुंबईत पावसाला सुरुवात झाल्यानंतर असंख्य मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र मुंबईतील या पावसामुळे पालिकेच्या कामकाजाचे तीन तेरा वाजवले. मुंबईत पहिल्याच दिवशी 27 जूनला काही ठिकाणी पाणी तुंबले, झाडे कोसळली, भिंत कोसळल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही शुक्रवारी (28 जून) मुंबईत हेच चित्र पाहायला मिळाले. मात्र या दोन्ही दिवशी मुंबईकरांनी पहिल्या पावसाचा आनंद घेतला. शनिवारी (29 जून) आणि रविवारी (30 जून) मुंबईत पावसाची उघडझाप सुरु होती. मात्र विकेंन्ड असल्याने मुंबईकरांना तितकासा फरक जाणवला नाही.
पण त्यानंतर रविवारी 30 जूनला रात्री 10 नंतर मुंबईत मुसळधार पाऊस कोसळू लागला. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीच हिंदमाता, परेल, दादर, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा यासारख्या सखल भागात पाणी तुंबण्यास सुरुवात झाली. यानंतर काल सोमवारी (1 जुलै) दिवस मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळाली.
गेल्या पाच दिवसांपासून सततच्या पावसामुळे मुंबई-ठाणे-पालघर परिसराला झोडपून काढले आहे. काल (1 जुलै) मुंबईसह ठाणे परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. दरम्यान आज (2 जुलै) मुंबईतील किंग्ज सर्कल, साकीनाका, घाटकोपर, धारावी, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, सायन, कुर्ला, विक्रोळीसह अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि घरात पाणी भरल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. रेल्वे रुळांवरही पाणी भरल्याने मुंबईची लाइफलाइन असलेली रेल्वेही ठप्प झाली आहे.
#Mumbairains Would like to announce and confirm that tomm 2nd July 2019 has been declared as holiday ,for all schools( public & private ) in Mumbai , Navi Mumbai, Thane , kokan areas ! Stay safe ! @mybmc @Dev_fadnavis @CMOMaharashtra
— ashish shelar (@ShelarAshish) July 1, 2019
तसेच हवामान विभागाने आज मुंबईसह पालघर, ठाणे या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री आशिष शेलार या ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.
The Government of Maharashtra has declared a public holiday in Mumbai today, for safety of Mumbai city & its citizens, in wake of the very heavy rainfall forecast by IMD #MumbaiRainsLiveUpdates #MumbaiRains #MumbaiRainsLive #MCGMUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 1, 2019
हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने आज मुंबई, नवी मुंबई, कोकण आणि ठाण्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. तसेच राज्य शासनाने सार्वजनिक सुट्टीही जाहीर केली आहे. तसेच मुंबई विद्यापीठातंर्गत आज प्रथम आणि द्वितीय वर्ष बीएस कॉम्प्युटर सायन्स ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र पावसामुळे ही परीक्षा रद्द करण्यात येत असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. तसेच आजच्या दिवशी घेण्यात येणाऱ्या महाविद्यालयीन परीक्षा नंतर घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.