मंत्रालयातील टॉप मोस्ट पाच सनदी अधिकाऱ्यांची बदली
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांची बदली गुरुवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली.
मुंबई : ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील टॉप मोस्ट पाच सनदी अधिकाऱ्यांची बदली केली आहे. गेल्या पाच वर्षापासून एकाच विभागात असलेल्या अधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. (Mantralaya IAS Officer Transfer)
सोमवारपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांची बदली गुरुवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली.
नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची बदली महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी (1) करण्यात आली आहे. करीर यांच्या जागी आय. एस. चेहेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चहल आतापर्यंत जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव होते.
महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची बदली वन विभागात झाली आहे. ते आतापर्यंत महसूल विभागात कार्यरत होते. वन विभागातील प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी यांची उद्योग विभागात ट्रान्स्फर करण्यात आली आहे. संजय खांदारे यांना अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात सचिवपदी नियुक्त करण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारने प्रशासनात फेरबदल करायला सुरुवात केली असली तरी यात नगरविकास आणि महसूल विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश नव्हता. आगामी अधिवेशनात येणाऱ्या महत्वाच्या विषयांवर गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी सर्व सचिवांशी बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर लगेच आदेश निर्गमित केले.
Mantralaya IAS Officer Transfer