‘तीन टप्प्यांत भाजपने किती जागा जिंकल्या’, अमित शाह यांचे भाकीत काय
गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर सभेत बोलताना काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. लोकसभेची ही निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी असल्याचं त्यांनी म्हटले आहे. यावेळी भाजपने तीन टप्प्यातील झालेल्या मतदानात किती जागा जिंकल्या आहेत याचा दावा देखील केला आहे.
Amit Shah : लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या चौथ्या टप्प्यातील मतदानाआधी भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी तेलंगणात जाहीर सभेला संबोधित करताना, 2024 ची निवडणूक ही राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी निवडणूक असल्याचं म्हटलं आहे. ही निवडणूक जिहादच्या विरोधात मतदानासाठी असल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.
‘राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी निवडणूक’
तेलंगणातील भोंगीर येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी महाराणा प्रताप यांची आठवण करून दिली. अमित शहा म्हणाले की, मुघलांविरुद्ध लढणाऱ्या महाराणा प्रताप यांचा आज वाढदिवस आहे. मी त्यांना सलाम करतो. यावेळची निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे. ही निवडणूक जिहाद विरुद्ध विकास अशी आहे. ही निवडणूक म्हणजे राहुल गांधींच्या चिनी हमीविरुद्ध मोदीजींच्या भारतीय हमीची निवडणूक आहे.
अमित शाह यांनी सभेत बोलताना, निवडणुकीच्या तीन टप्प्यांनंतर आम्ही 200 च्या जवळ पोहोचलो आहोत असे म्हटले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर हल्ला करताना ते म्हणाले, “रेवंत रेड्डी ऐका, यावेळी तेलंगणात आम्ही 10 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत आणि तेलंगणात दुहेरी अंक मोदीजींना 400 पार करणार आहेत.”
काँग्रेसचा मोदी-शहांवर आरोप
याआधी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठा आरोप केला होता. इलॉन मस्कची कंपनी टेस्ला तेलंगणामध्ये गुंतवणूक करू इच्छित होती, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना येथे येण्यापासून रोखले असा आरोप त्यांनी केला आहे. मस्कवर गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दबाव आणल्याचं त्यांनी म्हटले आहे.
भाजपला 400 जागा जिंकण्यापासून सहज रोखू, असा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. दक्षिण भारतात चांगल्या जागा मिळतील अशी त्यांना अपेक्षा आहे. यूपी आणि बिहारसारख्या राज्यांमध्येही पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी होण्याची शक्यता काँग्रेसने व्यक्त केली आहे. मात्र, पक्षाने तीन टप्प्यात किती जागांवर आघाडी घेतली हे अद्याप उघडपणे सांगितलेले नाही.