मतदानाच्या वाढत्या अंतिम आकडेवारीवरुन विरोधकांना शंका, राष्ट्रपतींची घेणार भेट
लोकसभेच्या मतदानाच्या वाढत्या अंतिम आकडेवारीवरुन विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कारण सगळीकडेच शेवटी टक्केवारी वाढतांना दिसत आहे. त्यासाठीच इंडिया आघाडीचे नेते उद्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.
Loksabha election 2024 : लोकसभेच्या मतदानाचे आतापर्यंत 3 टप्पे पार पडले आहेत. मात्र मतदानाच्या वाढत्या अंतिम आकडेवारीवरुन विरोधकांनी सवाल केलेत. आधीची आकडेवारी आणि सुधारित आकडेवारीत 10 टक्क्यांची वाढ कशी होऊ शकते ?, असा सवाल विरोधकांचा आहे. त्यासाठीच इंडिया आघाडीचे नेते उद्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. मतदानाची अंतिम आकडेवारी कशी काय वाढत चालली, असा सवाल महाविकास आघाडीनं केलाय.
संध्याकाळी 5 वाजताची आकडेवारी आणि अंतिम आकडेवारीत 10 टक्क्यांचा फरक कसा काय पडतो. एवढं मतदान कसं वाढतं, असे प्रश्न राऊत आणि पटोलेंनी केले आहेत. त्यासाठीच इंडिया आघाडी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंची भेट घेणार आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर, आतापर्यंत मतदानाचे 3 टप्पे पार पडले आहेत.
पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला आधी 54.34 टक्के मतदानाचा आकडा आयोगानं जारी केला. नंतर 11 दिवसांनी सुधारित आकडेवारी देत आयोगानं सांगितलं की, 63.71 टक्के मतदान झालं. इथं 9.37 टक्क्यांनी फरक पडला.
दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला 53.71टक्के मतदानाचा आकडा आयोगानं सांगितला. नंतर 4 दिवसांनी अंतिम आकडेवारी आयोगानं सांगितली 62.71 %. म्हणजेच फरक पडला 9 % मतदानाचा
तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी होती 53.40 % आणि रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी निवडून आयोगानं अंतिम आकडेवारी दिली. त्याप्रमाणं 61.44 % मतदान झालं. म्हणजेच फरक आहे 8.04 %.
एक दिवसआधीच महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्याचं मतदान झालं. एकूण 11 लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या मतदानावर एक नजर टाकुयात.
- बारामतीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 45.68% मतदान होतं आणि अंतिम आकडेवारी आयोगानं 56.07 % इतकी दिली म्हणजेच 10.39 % मतदानात भर पडली.
- कोल्हापुरात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 63.71 % मतदान झालं. अंतिम मतदानाची टक्केवारी झाली 70.35 %. म्हणजेच 6.64 % मतदानात भर पडली.
- माढ्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 50% मतांची नोंद झाली. अंतिम मतदान झालं, 62.17 %. मतदानात भर पडली 12.17 %
- रायगडमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 50.31% मतदान झालं. अंतिम मतदानांची आकडेवारी आहे 58.10%…म्हणजेच 7.79 % अधिक मतदानाची भर पडली.
- सोलापूरमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 49.17% मतदानाची नोंद होती…अंतिम मतदानानंतर ही आकडेवीर पोहोचली. 57.61 टक्क्यांवर…म्हणजेच 8.44 % अधिक मतदानाची भर पडली.
- सांगलीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.56% मतांची नोंद झाली…अंतिम टक्केवारी झाली 60.95 %..म्हणजेच 8.44 % अधिक मतदानाची भर 8.39
- साताऱ्यात लोकसभेत 5 वाजेपर्यंत 54.11% मतदान झालं…अंतिम आकडेवारी 63.05 % इतकी आहे….8.94% मतदानाची भर पडली.
- रत्नागिरी-सिंधुदुर्गात 5 वाजेपर्यंत 53.75% मतदान होतं..अंतिम टक्केवारी 59.23 % आहे…5.48 % मतदानाची भर पडली.
- हातकणंगलेत 5 वाजेपर्यंत 62.18% मतदान झालं…अंतिम आकडेवारी आहे 68.07 % ….5.89% मतदानाची भर पडली.
- धाराशीवमध्ये 5 वाजेपर्यंत 52.78% टक्के मतदान झालं…अंतिम आकडेवारी आहे 60.91%…8.13 % मतदानाची भर पडली.
- लातूर 5 वाजेपर्यंत 55.38% मतदान..अंतिम टक्केवारी आहे 60.18%…4.8 % मतदानाची भर पडली.
बऱ्याच ठिकाणी मतदान 6 वाजेनंतरही सुरुच असतं, त्यामुळं ती आकडेवारी कुठं जाणार असं भाजपचं म्हणणंय. तर विरोधकांनी शंका उपस्थित करत राष्ट्रपतींचं दार ठोठावण्याचा निर्णय घेतलाय.