Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघात की घातपात? इंटरलॉकिंग सिस्टममध्ये बदल केल्याचा पुरावा

| Updated on: Jun 06, 2023 | 11:16 AM

Odisha Train Accident : ओडिशामधील भीषण रेल्वे अपघाताचा सीबीआयने तपास सुरु केला आहे. हा अपघात घातपात असण्याची शक्यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे. यामुळे रेल्वेने या प्रकरणाची सीबीआय चौकशीची शिफारस केली.

Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघात की घातपात? इंटरलॉकिंग सिस्टममध्ये बदल केल्याचा पुरावा
Follow us on

भुवनेश्वर : ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघात होऊन आता तीन दिवस झाले आहेत. तीन दिवसानंतरही १०० मृतदेहांची ओळख अजून पटलेली नाही. अपघातात 278 जणांचा मृत्यू झाला आहे. 1100 लोक जखमी झाले आहेत. या तिहेरी रेल्वे अपघाताचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुरू केला आहे. सीबीआयचे १० सदस्यीय पथक सोमवारी बालासोर येथे पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रविवारी रेल्वेने या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती.

काय आहे रेल्वेचा दावा

रेल्वे अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवण्यावर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तथापि, रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्राथमिक तपासात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचा पुरावा मिळाला आहे. त्यानंतर रेल्वेने सीबीआय तपास करण्याची शिफारस केली.

हे सुद्धा वाचा

प्राथमिक तपासात दावा

प्राथमिक तपासानंतर ओडिशामधील अपघातामागे सिग्नल प्रणालीत केलेला बदल हे अपघाताचे कारण असल्याचे मानले जात आहे. यामुळे रेल्वेने स्टेशन रिले रूम आणि कंपाऊंड हाउसिंग सिग्नलिंग उपकरणांच्या सुरक्षेसाठी सर्व विभागीय मुख्यालयांना अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच एक सुरक्षा मोहीम देखील सुरू केली आहे, ज्यामध्ये दुहेरी लॉकिंग व्यवस्थेचा समावेश आहे.

का केली जाते सीबीआय चौकशी

सीबीआय चौकशीच्या प्रश्नावर रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासादरम्यान आम्हाला या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी गरज वाटत आहे. यामुळे सीबीआय तपास यंत्रणेची गरज आहे. एखाद्या हस्तक्षेपाशिवाय रेल्वेचा नियोजित मार्ग मेन लाईनवरून लूप लाईनवर बदलणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कसा झाला अपघात

बहनागा स्टेशनजवळ शुक्रवारी कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची एकमेकांना धडक बसली. यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे डब्बे यशवंतपूर हावडा एक्स्प्रेस ज्या रेल्वे रुळावरुन जात होती, त्या ठिकाणी पडले. यामुळे या गाडीचा अपघात झाला. या तिहेरी अपघातात अनेक डब्बे मालगाडीवर चढले. सात डब्बे पलटी झाले. चार डब्बे रेल्वे बाँड्रीच्या बाहेर गेले. एकूण 15 डब्बे पटरीच्या बाहेर होते.

या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखाच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच गंभीर जखमींसाठी दोन लाख आणि किरकोळ जखमींसाठी 50 हजाराच्या भरपाईची घोषणा करण्यात आली आहे.