राम मंदिर चोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांचं आंदोलन, पप्पू यादव भगवे वस्त्र घालून पोहोचले थेट संसद भवन परिसरात

अयोध्या येथील राम मंदिरात झालेल्या चोरीचा मुद्दा सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे, यावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं.

राम मंदिर चोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांचं आंदोलन, पप्पू यादव भगवे वस्त्र घालून पोहोचले थेट संसद भवन परिसरात
papu yadav
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 31, 2026 | 7:06 PM

अयोध्या येथील राम मंदिरात झालेल्या चोरीचा मुद्दा सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे, यावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात देखील वातावरण चांगलंच तापलं आहे. राम मंदिरात झालेल्या चोरीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. हाच मुद्दा पकडत काँग्रेस नेते राहुल गांधींसह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी संसद भवन परिसरात अनोखं आंदोलन केलं आहे. अपक्ष खासदार पप्पू यादव तर चक्क भगवे वस्त्र परिधान करून साधूच्या वेशात संसदभवन परिसरात दाखल झाले, विरोधी पक्षाच्या अनेक खासदारांनी यावेळी आपल्या हातामध्ये दानपेट्या घेतल्या होत्या. तसेच यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांच्या हातात एक मोठं बॅनर देखील होतं. या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. संसदेमधून अमित शाह गायब का आहेत? असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला होता.

शुक्रवारी विरोधी पक्षांकडून सरकारविरोधात एक अनोख आंदोलन करण्यात आलं. ज्यामध्ये अपक्ष खासदार पप्पू यादव यांना दान पेटीमधील पैशांवर डल्ला मारणाऱ्या चोराच्या रुपात दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर काही खासदार तिथे येतात आणि दानपेटीमध्ये काही पैसे टाकतात. परंतु पप्पू यादव त्या पैशांची चोरी करतात. त्यानंतर हे सर्व खासदार पप्पू यादव यांना पकडतात, असं हे नाट्य रुपांतरण होतं, या माध्यमातून विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

तर दुसरीकडे संसदेत अजूनही नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणात आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा मुद्दा शांत झालेला नाहीये, या मुद्द्यावरून विरोधकांकडून सातत्याने सरकारवर हल्लाबोल सुरूच आहेत. यावरूच दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गृहमंत्रालयाकडूनच पोलिसांना आदेश मिळाले होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावरून सत्ताधारी देखील चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले, राहुल गांधी यांनी ऑर्डर दाखवावी अन्यथा माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली, दरम्यान त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता, मी माझ्या डोळ्याने त्यांना फोन करताना पाहिलं होतं. मी भाजप आणि संघाची माफी मागणार नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us