मुंबई: विदर्भातील भाजपचे नेते अनिल बोंडे (anil bonde) यांना राज्यसभेचं तिकीट देऊन भाजपने (bjp) त्यांचं पुनर्वसन केलं आहे. बोंडे हे फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कृषी मंत्री होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मंत्री राहिलेल्या पराभूतांचे मागच्या दाराने पुनर्वसन करायचं नाही असा भाजपने नियम केला होता. त्यानुसार पंकजा मुंडे (pankaja munde), राम शिंदे यांचं पुनर्वसन झालं नाही. या नियमाला सर्वात प्रथम अपवाद ठरले ते गोपीचंद पडळकर. पडळकर अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढले होते. त्यामुळे त्यांचा पराभव होणार हे अटळ होतं. पण अजितदादांविरोधात तगडा उमेदवार पाहिजे म्हणून पडळकरांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नंतर त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं. तर चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं. पण अनिल बोंडे हे पराभूत झालेले असताना त्यांचं पुनर्वसन करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. जो नियम पंकजा मुंडे, राम शिंदेंना लागू होतो, तोच नियम बोंडेंना का लागू होत नाही? असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.
सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापलेला आहे. बावनकुळे ओबीसी होते. त्यामुळे भाजपने त्यांचं पुनर्वसन केलं. त्यामुळे ओबीसी हिताचे रक्षणकर्ते आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी बोंडे यांना तिकीट दिलं. त्यांचं पुनर्वसन करण्याचं हेच कारण आहे. सध्या महाराष्ट्र भाजपाची सर्व सूत्रे फडणवीसांच्या हातात आहेत. शिवाय अनिल बोंडे हे फडणवीसांच्या विश्वासातील आहेत. विदर्भातील आहेत आणि ओबीसी आहेत. आम्ही ओबीसींच्या हिताची काळजी घेतोय हे दाखवण्यासाठीच भाजपकडून बोंडेंना उमेदवारी देण्यात आली आहे. फायदा होईल. पण हा लाँगटर्मचा विषय आहे, असं द एशियन एजचे विशेष राजकीय प्रतिनिधी भगवान परब यांनी सांगितलं.
सोशल इंजिनीयरिंगच्या मुद्द्यावर बोंडेंचं पुनर्वसन करण्याची भाजपची भूमिका योग्यच आहे. त्यांनी विनय सहस्त्रबुद्धेंना बाजूला ठेवून बोंडेंना उमेदवारी दिली. सहस्त्रबुद्धे हे केंद्रात मंत्रीपदाचा दर्जा असलेलं पद भूषवित आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत ओबीसींचा मुद्दा गाजणार आहे. भाजप ओबीसी आरक्षणाचा मोठा इश्यू करणार आहे. बोंडेंना दिलेली उमेदवारी ही त्याची सुरुवात आहे, असं भगवान परब यांनी सांगितलं. तसेच पंकजा मुंडे यांना तिकीट दिलं असतं तरी त्यांनी स्वीकारलं असतं की नाही हे आताच सांगता येणार नाही. कारण राज्याच्या राजकारणात त्यांना अधिक रस आहे. शिवाय त्यांची बहीण लोकसभेत आहे. अशावेळी त्या राज्यसभेत गेल्या असत्या का या बाबत साशंकता आहे, असंही ते म्हणाले.
गोपीचंद पडळकरांनी बारामतीत जाऊन पवारांच्या विरोधात मोहीम उघडली होती. त्यामुळे त्यांचं पुनर्वसन करणं पक्षासाठी गरजेचं होतं. अशी माणसं मिळणार नाहीत. त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांना सिग्नल द्यायचा होता. भाजपला सत्ताधाऱ्यांचं खच्चीकरण करणारे नेते हवे आहेत. त्याची गरज आहे, त्यामुळेच अनिल बोंडे यांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. पण या पुनर्वसनाचा पालिका निवडणुकीशी काही संबंध आहे असं वाटत नाही. बावनकुळेंचं तिकीट नाकारल्यानंतर तो समाज नाराज झाला होता. त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थेत फटका बसू शकला असता म्हणून त्यांचं पुनर्वसन केलं होतं. बोंडेंच्या बाबतीत तसं वाटत नाही, असं राजकीय विश्लेषक, पत्रकार पांडुरंग म्हस्के यांनी सांगितलं.
बोंडे आक्रमक नेते आहेत. लोकांना अंगावर घेणारे नेते आहेत. सत्ताधाऱ्यांना नामोहरम करतात. मध्ये दंगल झाली होती. त्यावेळी संशयाची सूई कुणावर फिरवायची ते काम त्यांनी केलं. अशा लोकांना बळ देण्याचं काम भाजपने केलं आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना आक्रमक काम करण्याचे हे संकेत आहेत, असंही म्हस्के यांनी सांगितलं.
भाजपला शिवसेनेशी लढत द्यायची असेल तर ग्रासरुटला ज्या छोट्यामोठ्या जातीचे कार्यकर्ते, नेते आहेत, त्यांना आपल्याकडे खेचण्याशिवाय भाजपला पर्याय नाही. त्यामुळे या लोकांना जितकं समाविष्ट करून घेता येईल तेवढे प्रयत्न सुरू केले आहेत. अनिल बोंडे हे त्यापैकी एक उदाहरण आहे. मुंबई किंवा कोकण हा भाग बघितला तर या भाजपने या भागातील नेते किसन कथोरेंना आपल्याकडे आणलं. कथोरे हे पक्के राष्ट्रवादीवाले आहेत. आता ते भाजपमध्ये आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीतून आललेले छोट्या जातीतील लोकांना समाविष्ट करून कसं घेईल. हे भाजप पाहत असते. बोंडे कृषी श्रेत्राशी निगडीत आहे. कुणबी समाजाची ताकद त्यांच्याकडे आहे. ही व्होटबँक आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपचं हे सोशल इंजिनियरींग आहे, असं ‘आपलं महानगर’चे ठाणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील जावडेकर यांनी सांगितलं.
तावडे, मुंडे, शिंदे यांच्या तुलनेत बोंडे हे कमीत कमी उपद्रवी आहेत. किंबहुना उपद्रवीच नाहीत. इतर जी नावं आहेत ते आव्हान देणारे आहे. आव्हान देऊ शकणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांना बाजूला सारण्यात आलं आहे. बोंडे महत्त्वकांक्षी नाही. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं नाही. त्यामुळे भाजपला बोंडे चालतात, असंही जावडेकर यांनी सांगितलं.