
उत्तराखंडमधील चारधाम यात्रेतील एक प्रमुख आणि अत्यंत पवित्र ठिकाण म्हणून केदारनाथ धामला ओळखले जाते. हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

केदारनाथ या धामच्या ठिकाणी भगवान शिवाच्या अस्तित्वाची प्रकर्षाने अनुभूती येते. शिवपुराणात वर्णन केल्यानुसार, जो व्यक्ती आपल्या आयुष्यात एकदा तरी केदारनाथ धामला भेट देतो, त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो.

केदारनाथला भेट दिल्यानंतर येथील तलावाचे पाणी प्राशन केल्याने मनुष्य जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो, अशी श्रद्धा आहे. शिव महापुराणात केदारनाथबद्दल नमूद करण्यात आले आहे.

रुद्रप्रयाग जिल्ह्यात असलेले केदारनाथ हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून याला शिवलोक म्हणून ओळखले जाते.

पांडवांचे नातू, राजा परीक्षित यांचे पुत्र महाराजा जन्मेजय यांनी हे मंदिर बांधले म्हणूनच याला पंचकेदार असेही म्हणतात. यानंतर, आदि शंकराचार्य यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

काही दिवसांपूर्वी जप आणि पूजा करून केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले आहेत. पुढील सहा महिने हे मंदिर खुले राहणार आहे.

मात्र, या मंदिराशी संबंधित एक अत्यंत आश्चर्यकारक आणि अनाकलनीय रहस्य आहे.

केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिने बंद असतात, पण तरीही मंदिराच्या आत हजारो वर्षांपासून असलेला दिवा अखंड सुरु असतो.

तसेच स्थानिक लोकांच्या मते, मंदिर बंद असतानाही अनेकदा आतून घंटेचा आवाज येतो. आजपर्यंत कोणीही या रहस्याचा उलगडा करू शकलेले नाही.

परंतु पौराणिक कथेनुसार, जेव्हा मंदिर सहा महिने बंद असते, तेव्हा येथे स्वतः देव पूजा करतात. म्हणजेच, केदारनाथ मंदिरात मानव सहा महिने पूजा करतात आणि देव सहा महिने पूजा करतात, अशी अद्भुत श्रद्धा प्रचलित आहे.