
पाच सहा महिने कष्ट करून धानाची कापणी करून व मिरचीची तोडणी करून शेतात ठेवलेले होते. परंतु अचानक अवकाळी पाऊस आल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात शेतात असलेले मिरची व भाताचे पीक पूर्णपणे भिजले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस सुरु असल्याने बीडमधील शेतकऱ्याचे कांदे शेतातच सडले आहेत. यामुळे कांदे फेकून द्यावे लागले आहे. शेतमाल बाजारात नेण्यापूर्वीच अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यात टरबूज, कांदा, बाजरी, पपईसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात १४ दिवसांत पडलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे ७ हजार ४८२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. केळी पाठोपाठ फळे आणि मका पिकाला पावसाचा जोरदार फटका बसला आहे.

अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डाळिंब बागांना मोठा फटका बसला आहे. तर अकोले येथील अनेक भागात फळबागा, भाजीपाला आणि चारा पिकांचे नुकसान झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतातील पिकांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीसाठी आलेली बाजरी भिजली आहे. यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या संकटात सापडला आहे.