‘तो’ हल्ला सरकारकडूनच, भास्कर जाधवांचा थेट आरोप, पाहा काय म्हणाले?

माझी सुरक्षा काढली जाते अन् अवघ्या दोन तासात घरावर हल्ला होतो, यातून हेच स्पष्ट होतंय, असा दावा भास्कर जाधव यांनी केलाय.

तो हल्ला सरकारकडूनच, भास्कर जाधवांचा थेट आरोप, पाहा काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 20, 2022 | 3:49 PM

मुंबईः शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावरचा हल्ला (Attack) सरकारच्या माध्यमातूनच झाला, असा थेट आरोप करण्यात आलाय. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी त्या हल्ल्यासंबंधी आज माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुंबईत माझ्या संरक्षणासाठी खूप मोठा फौजफाटा होता. पण रात्री 11-12 च्या दरम्यान माझी सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली. त्यानंतर काही तासातच माझ्या चिपळूणच्या घरावर हल्ला झाला. याचा अर्थ यामागे सरकारचाच हात आहे, हे स्पष्ट आहे, असा आरोप जाधव यांनी केला. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

सरकारवर आरोप करताना भास्कर जाधव म्हणाले, ‘ हल्ला झाला तेव्हा मी मुंबईत होतो. माझ्या संरक्षणासाठी खूप मोठा फौजफाटा होता. पण रात्री 11-12 च्या दरम्यान माझी सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली. मला एकही पोलिस ठेवला नाही. माझ्या चिपळूणच्या राहत्या घराचं संरक्षण काढून घेतलं. मुंबईतल्या घरासमोरचं संरक्षण काढलं. मला वैयक्तिक रित्या महाराष्ट्रात फिरण्यासाठी जे संरक्षण होतं, तेही काढून घेतलं…

त्यानंतर अवघ्या दोन तासानं माझ्या घरावर हल्ला होतो. याचा अर्थ हा हल्ला सरकारच्याच सहकार्यानं आणि सरकारच्याच माध्यमातून गुंडांनी केलाय, हे स्पष्ट झालंय, असा दावा भास्कर जाधव यांनी केला.

राजकीय आरोप-प्रत्यारोप करताना पातळी सोडून वक्तव्ये केली जात आहेत, असा आरोप होतोय, यावर भास्कर जाधव म्हणाले, ‘ गेली अडीच वर्ष राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. आज भाजप नेते ज्या सभ्यतेच्या गोष्टी करत आहेत, आज जे त्यांच्या नेत्यांचा मान राखा म्हणतात.. त्याच भाजपाच्या नेत्यांचा उद्धव ठाकरेंबद्दलचं एक एक स्टेटमेंट काढून पहा. राजकारणाचा स्तर आधी त्यांनी या लेवलला नेलाय, असा आरोप भास्कर जाधव यांनी केलाय.