Shiv Sena : शिवसेना- शिंदे गटावर रामदास आठवले बोलले अन् भविष्यही सांगितले

शिंदे गटाने आपले स्वत:चे अस्तित्वच निर्माण केले असे नाही तर त्यांच्याकडे आता दोन तृतीअंश पेक्षा अधिक संख्याबळ आहे. ज्यांच्याकडे बहुमत त्यांचाच पक्ष हे स्पष्ट आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेनेचे नेतृत्व एकनाथ शिंदे करतील तर उद्धव ठाकरे यांच्याकडे संख्याबळ कमी आहे. शिवाय ते दिवसेंदिवस आणखी कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात ते उभारी घेतील असे वाटत नाही.

Shiv Sena : शिवसेना- शिंदे गटावर रामदास आठवले बोलले अन् भविष्यही सांगितले
रामदास आठवले आणि उध्दव ठाकरे
| Updated on: Jul 25, 2022 | 9:51 AM

मुंबई : राज्यात सध्या (Shiv Sena) शिवसेना पक्ष अन् शिंदे गटाचीच चर्चा सुरु आहे. शिवसेनेकडून टिकेचे बाण सुरु आहेत तर (Eknath Shinde) शिंदे गट हीच शिवसेना असल्याचा दावा आता शिवसेनेतील बंडखोर नेते करीत आहेत. सध्या हे प्रकरण कोर्टात असले तरी जो-तो याबाबत तर्क-वितर्क मांडत आहेत. आता (Ramdas Athawale) केंद्रीय मंत्री रामदास आठवलेही यामध्ये माघे राहिलेले नाहीत. त्यांनी तर शिवसेनेची झालेली अवस्था आणि त्या पक्षाचे भवितव्य काय हे देखील सांगून टाकले आहे. ज्यांच्याकडे बहुमत त्यांच्या पक्ष अशा एका वाक्यात त्यांनी तो विषय मिटवला. एवढेच नाही तर भविष्यात पुन्हा उद्धव ठाकरे उभारी घेतील असेही वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर शिंदे यांच्या रुपाने खरी शिवसेना ही मोदींसोबत असल्याचेही ते म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंच्या गटात कमी संख्याबळ

शिंदे गटाने आपले स्वत:चे अस्तित्वच निर्माण केले असे नाही तर त्यांच्याकडे आता दोन तृतीअंश पेक्षा अधिक संख्याबळ आहे. ज्यांच्याकडे बहुमत त्यांचाच पक्ष हे स्पष्ट आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेनेचे नेतृत्व एकनाथ शिंदे करतील तर उद्धव ठाकरे यांच्याकडे संख्याबळ कमी आहे. शिवाय ते दिवसेंदिवस आणखी कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात ते उभारी घेतील असे वाटत नाही. या गटातील घटती संख्या अशीच राहिले तर काय भवितव्य राहणार असाही सवाल आठवले यांनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदेंसोबत मोदी

राज्यात सत्तापरिवर्तन होऊन एक मजबूत सरकार राज्याला मिळाले आहे. त्यामुळे विकासकामांचा तर वेग वाढेलच पण सर्वसामान्यांना न्याय मिळेल. राज्यात आणि केंद्रात एकच सरकार राहिल्यास विकास कामांवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. शिवाय आता एकनाथ शिंदेंसोबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याने कोणत्याही कामास अडचणी निर्माण नसल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

खरी शिवसेना शिंदेसोबत

शिवसेना कुणाची हा वाद कोर्टात असला तरी मात्र, खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि एकनाथ शिंदे हे आता मोदींसोबत आहेत. शिवाय शिंदे गटाकडे पदाधिकारी, खासदार, नगरसेवक यांचा कल वाढत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडील संख्याबळ कमी होत असल्याने ते भविष्यात उभारी कशी घेणार असा सवालही रामदास आठवले यांनी उपस्थित केला.

Follow Us