आधी कर्नाटकवर बोला, मग समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करा, उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन

अब्दुल सत्तारांवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, ' एका महिलेचा अपमान करणारा. तिला शिवी देणारा माणूस अजूनही मंत्रिमंडळात आहे. तुम्ही काय आम्हाला शिवाजी महाराज शिकवणार?

आधी कर्नाटकवर बोला, मग समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करा, उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 10, 2022 | 4:23 PM

जालनाः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नरेंद्र मोदी यांना आवाहन केलं आहे. महाराष्ट्रात दोन ज्वलंत प्रश्न आहेत. छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल आणि कर्नाटक महाराष्ट्रात अन्याय झेलणारे मराठी बांधव, या दोन मुद्द्यांवर आधी तुमची भूमिका स्पष्ट करा आणि त्यानंतरच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेल्या समृद्धी महामार्गाचं उद्धाटन करा, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.

42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते. जालन्यात घनसावंगी येथे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरे भाजप आणि एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार प्रहार केला.

पंतप्रधानांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ तुम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटकावर आधी बोलावं. कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची जी आरेरावी सुरु आहे, तिच्या बद्दलही तुम्ही सणकून बोललंच पाहिजे. अख्खा महाराष्ट्र तुमच्या कर्नाटकवरील भूमिकेची वाट पाहतोय.

एका मोठ्या रस्त्याचं तुम्ही उद्घाटन करत असताना… महाराष्ट्रासाठी कर्नाटक आपले रस्ते बंद करत असताना पंतप्रधान म्हणून तुम्ही त्यांना काय बोलणार आहात, ते तुम्ही बोला आणि मग शिवसेना प्रमुखांच्या नावाने असलेल्या महामार्गाचं उद्घाटन करा…

भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ स्वतः पंतप्रधान येत आहेत. राज्यपालांच्या वक्तव्यावर ते पांघरुण घालण्याचा प्रयत्न करतील. बोलण्याचा तुमचा अधिकार आहे. पंतप्रधान आहात तर देशाच्या पालकासारखे बोला. महाराष्ट्र म्हणजे पालकाची भाजी आहे, असं समजू नका. आम्ही एवढे मिंधे नाहीयेत. जे होते ते निघून गेले, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला लगावला.

अब्दुल सत्तारांवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ एका महिलेचा अपमान करणारा. तिला शिवी देणारा माणूस अजूनही मंत्रिमंडळात आहे. तुम्ही काय आम्हाला शिवाजी महाराज शिकवणार?
मी होतो तेव्हा एका मंत्र्याला काढून टाकलं होतं. नाही तर या भाषणांना काय अर्थ आहे? त्याला तर तेव्हाच मंत्रिमंडळातून काढून टाकायला पाहिजे होतं…
बरं झालं ज्ञानेश्वर आता नाहीयेत. त्यावेळेला वेद बोलणारा रेडा होता. आताचे रेडे वेगळे आहेत. हे वेद बोलत नाहीत.. नुसते खोका खोका बोलतात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us