दहा दिवसांत अकरा हत्या, पुण्यात हत्यांचं सत्र सुरुच
पुणे : शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर, अशी पुण्याची ओळख आहे. मात्र पुण्यात गुन्हेगारी कारवायांनी डोकं वर काढलं आहे. गेल्या दहा दिवसांत पुण्यात अकरा हत्या झाल्या आहेत. एका दिवसाला एक हत्या होते आहे. वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे पुणेकरांमध्ये भितीचं वातावरण आहे. मंगळवारी पहाटे पित्याने माय लेकींची हत्या केल्याची खळबळजनक घटना ताडीवाल परिसरात घडली. या दुहेरी हत्याकांडानं […]
पुणे : शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर, अशी पुण्याची ओळख आहे. मात्र पुण्यात गुन्हेगारी कारवायांनी डोकं वर काढलं आहे. गेल्या दहा दिवसांत पुण्यात अकरा हत्या झाल्या आहेत. एका दिवसाला एक हत्या होते आहे. वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे पुणेकरांमध्ये भितीचं वातावरण आहे.
मंगळवारी पहाटे पित्याने माय लेकींची हत्या केल्याची खळबळजनक घटना ताडीवाल परिसरात घडली. या दुहेरी हत्याकांडानं पुणं पुन्हा एकदा हादरलं आहे. ‘मैं किसीको नहीं छोड़ूगा, निकल जाओ ये घर छोडके’, असा संदेश रक्ताने भिंतीवर लिहलेला आणि पलंगावर रक्तबंबाळ मायलेकींचा मृतदेह होता. माय लेकीच्या या दुहेरी हत्याकांडाने परीसरात खळबळ उडाली आहे.
ताडीवालचं माय लेकींचं दुहेरी हत्याकांड ही दहा दिवसांत हत्येची दहावी घटना आहे. या घटनेपुर्वी शहराच्या वेगवेगळ्या भागात दहा हत्याकांड झाले. दहा दिवसांत तब्बल अकरा जणांचा जीव गेला. दिवसागणिक एक एक हत्या झाली. कधी खंडणीसाठी विद्यार्थ्याची हत्या, कधी सराईत गुंडाचा गेम, तर कधी मित्रानेच केला घात. एकापाठोपाठ घडणाऱ्या हत्याकांडाने शांत पुणे अशांत झालं आहे.
कधी आणि कुठे झाल्या या हत्या?
1) वारज्यात स्मशानभूमीजवळ अनोळखी तरुणाची हत्या
2) खंडणीसाठी दहावीतील निखील आंग्रोळकरची हत्या
3) पर्वतीत जनता वसाहतीत सराईत गुन्हेगार निलेश वाडकरची विरोधी टोळीकडून हत्या
4) आंबेगावात व्यवसायिक रकीबचंद ओसवाल यांची खंडणीसाठी हत्या
5) कात्रजला नवीन बोगद्याजवळ हत्या
6) सिंहगड मार्गावर अल्पवयीन मुलांकडून हरीची हत्या, दारुसाठी पैसे मागितल्यानं हत्या
7) कॅम्प परीसरात रफीक शेखची हत्या
8) फुरसुंगीला मंगलसिंग माहुसिंगची हत्या, वैमनस्यातून मजुरांनी केली हत्या
9) हडपसर राहुल पाटीलची हत्या, पैशाच्या वादातून हत्या
10) ताडीवालचं माय लेकींचं दुहेरी हत्याकांड
दिवसागणिक होणार्या हत्याकांडाने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. पुण्यात रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून नागरीक कामधंद्यासाठी इथे येत असतात. त्याचबरोबर विद्यार्थीही शिक्षणासाठी पुण्यात येतात. मात्र गुन्हे आणि हत्यांच्या घटनांत वाढ होत असल्याने सध्या पुण्यात भितीचं वातावरण आहे. अवैध व्यवसाय, पैशाची लालसा, शेतीचे व्यवहार आणि व्यसनाधीनतेत गुन्हेगारीची मुळं असल्याचं जाणकार सांगतात.
शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांचे वेगवेगळे पथक काम करत असतात. गुप्त वार्ता विभाग, स्थानिक गुन्हे अन्वेषणसह अनेक विभाग कार्यरत असतात मात्र तरही गुन्हेगारी वाढत आसल्याने पोलीस यंत्रणा निष्क्रीय ठरल्याचं चित्र आहे.
संबंधीत बातम्या :
आधी खंडणीसाठी मित्राची हत्या, नंतर मृतदेह शोधण्यासाठी मदतीचा बनाव