राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज, कुठे तुरळक, तर कुठे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
कोकण किनार पट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे : राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा (Maharashtra Rain Update) अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण किनार पट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा (Maharashtra Rain Update) इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, आज (19 एप्रिल) मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाट आणि वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 20 एप्रिलला गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडात वाऱ्यासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, विदर्भात विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सोलापुरात गारपीटीसह जोरदार पाऊस, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसानhttps://t.co/nj5Fo2RKBa#SolapurRain #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 18, 2020
21 एप्रिलला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुण्यात 19 एप्रिलला आकाश अंशतः ढगाळ वातावरण असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे (Maharashtra Rain Update).
चंद्रपुरात मुसळधार पावसाला सुरुवात
चंद्रपूर शहरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्री उशिरा वादळी वाऱ्यासह पावसाने शहर-जिल्ह्याला झोडपून काढले. सुमारे 2 तास हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. तर सकाळी आकाशात ढग नसतानाही अचानक पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. चंद्रपुरात रात्री तब्बल 55 मिमी पावसाची नोंद झाली.
नागपुरातही वादळी वाऱ्यासह पाऊस
नागपूरात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. हवामान खात्याने आधीच पावसाचा इशारा दिला होता. भर उन्हाळ्यात झालेल्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. तर नागपुरातील वाढलेल्या तापमानातही घट झाली आहे. मात्र, या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकं आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं आहे.
सोलापुरात गारपीटीसह जोरदार पाऊस
सोलापुरात झालेल्या गारपीटीसह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आधीच कोरोनामुळे सोलापुरातील शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यातच अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट ओढवले आहे. पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांनी जनावरांसाठी ठेवलेल्या कडब्याचंही पावसात नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने काही ठिकाणी ग्रामीण भागातल्या लोकांच्या घरावरची पत्रे उडून गेली आहेत, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
Maharashtra Rain Update