Pakistan Cricket : टीम इंडियाला हरवलं, मोठा जल्लोष केला; पण त्यानंतरच आमची वाट लागली, मोहम्मद यूसुफचा मोठा खुलासा
Pakistan Cricket Downfall : भारताविरुद्ध 2021 टी20 वर्ल्डकपमध्ये मिळवलेला 10 विकेट्सचा विजय पाकिस्तानसाठी ऐतिहासिक ठरला. मात्र, याच विजयानंतर संघातील खेळाडूंमध्ये घमंड आला, गटबाजी वाढली आणि प्रत्येकाला कर्णधार होण्याची इच्छा झाली, असा दावा पाकिस्तानचे माजी कर्णधार मोहम्मद यूसुफ यांनी केला आहे.

पाकिस्तान क्रिकेटचा सध्या वाईट काळ सुरु आहे. पुरुषांच्या टीमला इंग्लंडकडून कसोटी मालिकेत सातत्याने पराभवाचा सामना करावा लागतोय. तर दुसरीकडे आशिया कपमध्ये भारताच्या वाघिणींनी महत्त्वाच्या सामन्यामध्ये महिला संघालाही हरवलं आहे. पाकिस्तानचं हे पराभव सत्र काही थांबायचं नाव घेत नाही.
गेल्या काही वर्षांमधील अनेक मोठ्या मालिकांचा विचार केल्यास पाकिस्तान फारशी चांगली कामगिरी करु शकलेला नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, पाकिस्तानच्या या वाईट काळाची सुरुवात नेमकी कधी झाली. तर याच उत्तर पाकिस्तानच्या माजी कर्णधारानेच दिलं आहे. होय, मोहम्मद यूसुफने यावर भाष्य केलं आहे. तो जे काही बोललाय ते वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
यूसुफ यांच्या मते 2021 मधील टी20 वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध मिळालेला मोठा विजय हाच कारण ठरला आहे. 10 विकेट्सने मिळवलेला विजय पाकिस्तानचे खेळाडू पचवू शकले नाही.
भारताविरुद्ध मोठा विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू हवेत गेले होते. त्या सामन्यात दुबईमध्ये बाबर आणि रिजवानने 152 धावांचं आव्हान पूर्ण केलं होतं. वर्ल्डकपमधील हा पाकिस्तानचा पहिला विजय होता. त्यामुळे सगळा पाकिस्तान आनंदात होता, मोठा उत्सव करत होता.
दरम्यान, आता पाच वर्षांनंतर यूसुफ यांचं मत आहे की, याच विजयाने पाकिस्तानच्या टीमचं मोठं नुकसान केलं. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितलं की, “पाकिस्तानच्या संघाला असं वाटत होतं की हा खूप मोठा विजय आहे. पण कोणीही पुढील नियोजनाचा विचार केला नाही. जेव्हा तुम्ही चांगलं खेळता तेव्हा तुम्ही हवेत न जाता पुढील नियोजनावर काम केलं पाहिजे. पण आमच्या संघातील खेळाडूंनी कॉलर उडवली. खूप घमंड आलं होतं. जेव्हा तुम्ही इतरांचा अपमान करता त्यांची इज्जत करत नाही तेव्हा तुम्हीही निश्चितच अडचणित येता. पाकिस्तानसोबत नेमकं हेचं झालं”
एवढंच नाही तर पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की या विजयानंतर प्रत्येकाला कर्णधार व्हायचं होतं. त्यामुळे टीममध्ये गटबाजी तयार झाली. त्याचा संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला. कोच बदलले, कर्णधार बदलले. बोर्डचा खेळाडूंना पाठिंबा आहे. पण खेळाडू जबाबदारीने खेळत नाहीत, असं मत यूसुफ यांनी मांडलं.