एवढं प्रेम केलं की त्याच्यासाठी प्राणही त्यागला! मालकाचा बुडून मृत्यू, कासावीस झालेल्या कुत्र्यानंही मान टाकली
सोशल मीडियामध्ये ही पोस्ट वेगानं व्हायरल झाली आहे. सुजयचं जाणं आणि त्याच्या कुत्र्यानंही जीव त्याग करणं, ही बाब अनेकांच्या अंगावर काटा आणतेय.

चिपळूण (Chiplun) तालुक्यात एक दुःखद घटना घडली. दोघांचा बुडून मृत्यू झाला. दोघांना वाचवण्यात यश आलं. पण दोघांचा शोधही लागला नाही. कालव्यातून येणारं पाणी अचानक वाढलं. पाण्याचा अंदाज कुणालाच आला नाही. चौघेजण बुडाले. चौघांपैकी दोघांना गावातल्यांना वाजवलं. पण इतर दोघांची काळ आणि वेळ एकाच वेळी आली. बुधवारी 27 एप्रिल रोजी घडलेली ही घटना काळीज पिळवटून टाकणारी आहे. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पण काळजात हात घालणारा एक हृदयस्पर्शी प्रसंग (Emotional Story) त्यानंतर घडला. बुडालेल्या दोघांपैकी एका मुलानं गेली अनेक वर्ष पाळलेला कुत्रा, मालकाच्या जाण्यानं कासावीस झाला होता. त्याला काहीच सुचेनासं झालं होतं. सारखा तो मालकाच्या शोधासाठी पाण्याच्या ठिकाणी जात होता. आपल्या मालकाला आळवत होता. पण तो नाही, हे पाहून अखेर कुत्र्यानंही (Dog Love) मान टाकली. आपला जीव त्यागला आणि तिथेच अखेरचा श्वास घेतला. आता या दोघांच्या मृत्यूनंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते आहे. प्राण्याचं प्रेम, त्यांची माया, त्यांची आस्था जगातल्या कोणत्याच गोष्टीही होऊ शकत नाही, हे अधोरेखित करणारी ही घटना आहे.
नेमकं काय झालं होतं?
27 एप्रिलची घटना. कोलकेवाडी या शिरगाव इथल्या कालव्याजवळ चौघे फिरण्यासाठी गेले. अचानक कालव्यातून पाणी वाढलं. चौघेही बुडाले. पण स्थानिकांनी तातडीनं बुडणाऱ्यांच्या दिशेनं धाव घेतली. दोघांना वाचवण्यात यश आलं. पण दोघे जण वाहून गेले. कुठे गेले, त्यांचं काय झालं, हे काहीच कळायला मार्ग नव्हता. सुजय संजय गावठे आणि त्याची मैत्रीण ऐश्वर्या श्रीकांत खांडेकर यांचा शोध घेतला जातोय. शाहीन कुट्टीनो आणि रुद्र जंगम हे बालंबाल बचावले.
सुजयच्या विहरानं त्याचा कुत्रा कासावीस
दरम्यान, सुजयचं अकाली निघून जाणं, परत न येणं हे, जितकं त्याच्या घरातल्यांसाठी दुखावणारं आणि हारवणारं होतं, तितकंच ते सुजयसाठी प्रिय असलेल्या त्याच्या कुत्र्यासाठीही होते. गेले तीन वर्ष सुजयनं या कुत्र्याचा सांभाळ केला होता. त्यांच्या मैत्रीचं नातं तयार झालं होतं. कुत्र्यांला सुजयचं जाण पचलच नव्हत. तो सुजयच्या शोधासाठी सारखा कालव्याच्या ठिकाणी येत होता. आपला मित्र सुजयला आळवत होता. कासावीस होत होता.
दीड तासांचा शोध
दीड तास कुत्रा त्याला शोधत होता. पण आपलं माणूस नाही, तर आता आपलं माणूस नाही, तर आपणही का असावं? हे त्या मुक्या प्राण्याला वाटलं. त्याची तब्बेत खालवत गेली. अखेर त्यानं मान टाकली. या दोघांच्या मृत्यूची हृदयस्पर्शी पोस्ट सध्या सोशल मीडियात आणि संपूर्ण चिपळुणात व्हायरल जाली आहे. संजय सुर्वे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की,…
सुजय संजय गावठे ….
तुझे अपघाती बेपत्ता होणं तमाम अलोरेवासियासाठी धक्कादायक घटना आहेच…आपल्या जवळच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तुझ्या जीवाची झालेली घालमेल आणि त्यामुळेच तू वाचवण्यासाठीच तर पुन्हा मागे फिरलास …तुझ्यावर आणखी कोणाचा तरी जीव होताच..तू प्रेमाने तीन वर्षे संभाळलेला तुझा सोबती …तुझ्या शोधासाठी दीड तास व्याकुळ होता..तुला शोधत राहिला….त्याचे प्रयत्न हरले म्हणून तो पाण्याबाहेर दिसला…
तू नाही तर त्याने काहीच घेतले नाही …एका मुक्या जीवाला समजलं की आपलं माणूस नाही तर आपणही का असावे?
सुजय , तू हरवलास आणि समस्त अलोरे पंचक्रोशीतील तुझ्यावर प्रेम करणारे या क्षणापर्यंत शोधतच राहिलेत ……या मुक्या जीवाला कोणते संकेत मिळाले आणि कासावीस होऊन जगाचा निरोप घेतला असेल….काय समजू आम्ही कसे समजावू मनाला?अनेकांची दोस्ती निभावण्यासाठी आणि वेगळं काही दाखवण्यासाठी आम्ही सारे तुझ्या प्रतीक्षेत आहोत
सोशल मीडियामध्ये ही पोस्ट वेगानं व्हायरल झाली आहे. सुजयचं जाणं आणि त्याच्या कुत्र्यानंही जीव त्याग करणं, ही बाब अनेकांच्या अंगावर काटा आणतेय. ही गोष्ट कळल्यावर अनेकांना गहिवरुन आलंय. संपूर्ण अलोरेमधील लोकांनी नव्हे तर अनेकांनी या घटनेनंतरत हळहळ व्यक्त केली आहे.