उद्धव ठाकरे यांची आता फक्त एमआयएमशी युती करणं बाकी, भाजपच्या नेत्याचा निशाणा
ठाकरे आणि हिंदुत्वाचा कोणताही संबंध नाही, हिंदुत्ववादाच्या विरोधात जाऊन राजकारण करत असल्याची प्रसाद लाड यांची टीका
लव्ह जिहादला विरोध आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यासाठी मुंबईत सकल हिंदू समाजाने विराट मोर्चाचं आयोजन केले. या मोर्चात शिंदे गट आणि भाजपचे नेतेही सहभागी झालेत. मात्र या मोर्चात ठाकरे गटातील नेत्यांची गैरहजेरी पाहायला मिळाले. त्यावरून भाजपने चांगलाच हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी कधीच हिंदुत्व सोडले आहे. आता फक्त त्यांची एमआयएमशी युती करायचं तेवढं बाकी राहिल्याची टीका भाजपच्या नेत्याने या मोर्च्याच्यावेळी केली.
या मोर्च्यात भाजप नेत्यासह शिंदे गटही सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान लव्ह जिहादच्या विरोधातील हा मोर्चा आहे. हे हिंदू राष्ट्र व्हावे ही आमची मागणी असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी दिली. त्यांनी असेही सांगितले की, विधान परिषद आणि विधानसभेत लव्ह जिहादच्या कायद्याची मागणी करणार आहोत, महिलांच्या हिताचा हा मोर्चा आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडलं. आता त्यांनी फक्त एमआयएमसोबत युती करणं बाकी आहे. ठाकरे आणि हिंदुत्वाचा कोणताही संबंध राहिलेला नाही, हिंदुत्ववादाच्या विरोधात जाऊन ते राजकारण करत आहेत, अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली.