ज्वारीच्या पेऱ्यात घट, यंदाच्या रब्बीत गहू, हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार

| Updated on: Nov 05, 2021 | 11:22 AM

ज्वारीला डावलून हरभरा आणि गव्हावर शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे. शिवाय हरभाऱ्यासाठी पोषक वातावरण असल्याने यंदा क्षेत्र वाढणार असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. अनुदानतत्वावर हरभऱ्याच्याच बियाणाचे अधिक वाटपही कृषी विभागाने यंदा केले होते. त्यामुळेच उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनीही या दोन पिकावरच भर दिलेला आहे.

ज्वारीच्या पेऱ्यात घट, यंदाच्या रब्बीत गहू, हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : खरिपात (Kharif Season) पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले असले तरी हा पाऊस रब्बी हंगामासाठी पोषक ठरत आहे. राज्यात सर्वत्र रब्बी पेरणीला सुरवात झाली आहे. मात्र, पावसामुळे पेरण्या लांबणीवर पडलेल्या होत्या. त्यामुळे ज्या पिकास पोषक वातावरण त्याच पिकावर शेतकऱ्यांनीही भर दिलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ज्वारी हे प्रमुख मानले जाते यंदा मात्र, या भागातही ज्वारीला डावलून ( increase in gram production) हरभरा आणि गव्हावर शेतकऱ्यांनी भर दिलेला आहे. शिवाय हरभाऱ्यासाठी पोषक वातावरण असल्याने यंदा क्षेत्र वाढणार असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. अनुदानतत्वावर हरभऱ्याच्याच बियाणाचे अधिक वाटपही कृषी विभागाने यंदा केले होते. त्यामुळेच उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनीही या दोन पिकावरच भर दिलेला आहे.

सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन काढण्याची शेतकऱ्यांकडे चांगली संधी आहे. पावसामुळे पेरण्या लांबल्या असल्या तरी त्याचा परिणाम हा उत्पादनावर होणार नाही. त्यामुळे मराठवाड्याती शेतकऱ्यांनी यंदा प्रथमच ज्वारीला बाजूला सारत हरभरा पेरणीवर भर दिलेला असल्याचे चित्र आहे.

यामुळे ज्वाराकडे होतेय दुर्लक्ष

ज्वारी हे उत्पादनाबरोबरच कडब्याच्या रुपाने जनावरांसाठी चाराही उपलब्ध होतो. त्यामुळे उस्मानाबाद, सोलापूर, लातूर या जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे क्षेत्र हे वाढलेले होते. मात्र, ज्वारीचे दर दिवसेंदिवस घटत आहेत. गतवर्षी तर ज्वारीला 1500 रुपये क्विंटलचा दर होता. शिवाय या दरात अद्यापपर्यंत सुधारणा ही झालेली नाही. जनावरांसाठीही आता हिरवा चारा म्हणून घास, मारवेल या हिरवा चारा लागवड केली जात आहे. शिवाय ज्वारीची काढणी ही अधिक कष्टाची आहे. काढणीसाठी मजूरही मिळत नाहीत. त्यामुळे कधीकाळी रब्बीतील प्रमुख मानल्या जाणाऱ्या ज्वारीकडे शेतकरी आता दुर्लक्ष करीत आहेत. केवळ जिरायत क्षेत्रावर ज्वारीचा पेरा होत आहे.

हरभऱ्यासाठी कृषी विभागाचाही पुढाकार

पावसामुळे यंदा ऑक्टोंबर महिन्यापर्यंत शेत जमिनी ह्या चिभडलेल्या होत्या. त्यामुळे या क्षेत्रावर ज्वारीपेक्षा हरभऱ्याची पेरणी केली तर उत्पादन वाढणार असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला होता. शिवाय यंदा अनुदानावर हरभरा हेच बियाणे कृषी विभागाने उपलब्ध केले होते. त्याचा परिणाम आता पेरणीच्या दरम्यान दिसून येत आहे. कृषी विद्यापीठाने ठरवून दिल्याप्रमाणे पुसा 256, पंत जी 114, KWR 108 आणि KWR 850 इत्यादी सुधारित बियाणांचा बियाणांचा वापर शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे पेरणीपर्यंत तर सर्वकाही पोषक असल्याने आता बदललेल्या पीक पध्दतीचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होणार हे पहावे लागणार आहे.

हरभऱ्यापाठोपाठ गव्हाचे वाढणार क्षेत्र

गव्हाचे उत्पादन केवळ शेत गहू खाण्यास मिळावे एवढाच होता. पण आता शेतकऱ्यांची मानसिकता बदलून उत्पादनाच्या दृष्टीने या पिकाचा विचार केला जात आहे. केवळ पंजाब, राज्यस्थान या राज्यापर्यंतच हे पिक मर्यादित राहिले नसून आता महाराष्ट्रातही क्षेत्र वाढत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापसून ते 25 नोव्हेंबर पर्यंत गहू पेरणीला पोषक वातावरण राहणार आहे. या वेळेत पेरणी झाली तर उत्पादनात देखील वाढ होणार असल्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. मात्र, पेरणीपुर्व मशागत ही महत्वाची राहणार असून मशागत केल्यानंतर जमिनीत ओल असणेही तेवढेच महत्वाचे आहे. वेळप्रसंगी शेत जमिन ओलवून पेरणी केली तरी चालेल पण ओल नसताना पेरणी केली तर उगवणीचा धोका निर्माण होतो.

बीजप्रक्रिया शिवाय चाढ्यावर मूठ धोक्याचीच

बीजप्रक्रिया ही अत्यंत साधा आणि सोपी पध्दत पण तेवढीच महत्वाची आहे. कारण यावरचे पीकाची उगवणक्षमता अवलंबून असते. तर पेरणीपूर्वी अवघ्या एक ते दोन तास आगोदर शेतकऱ्यांनी जे बियाणेची पेरणी करायची आहे त्या एक किलो प्रति बियाणाला 3 ग्रॅम थायराम किंवा कॅप्टन अन्यथा बाविस्टीन यापैकी एकाने ते बियाणात मिसळयाचे आहे. त्यानंतर रायझोबियम या जीवाणू संवर्धकाची 10 मिली प्रति 1 किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रीया करुन हे बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी लागणार आहे. मात्र, वरती सांगितल्याप्रमाणेच शेतकऱ्यांनी प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या :

उत्तर भारतामधील राजमा वाढतोय महाराष्ट्रातील रब्बीच्या हंगामात

फटाक्यांचा ना आवाज ना धूर तर बाहेर पडतात भाजीपाला वनस्पती

PM Kisan : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM KISAN च्या 10 व्या हप्त्याचे पैसे ‘या’ तारखेला बँक खात्यात येणार