निसर्गाचा लहरीपणा त्यात महावितरणची अवकृपा, सांगा शेती करायची कशी ?

| Updated on: Jan 27, 2022 | 10:24 AM

वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांचे नुकसान होत आहे तर अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये रात्रीचा दिवस करुन रब्बीतील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. सध्या कृषीपंपाना 7 तास विद्युत पुरवठा केला जात आहे तो ही रात्रीच्या वेळी. त्यामुळे अडचणीत असलेला बळीराजा एकच प्रश्न उपस्थित करीत आहे तो म्हणजे सांगा शेती करायची कशी?

निसर्गाचा लहरीपणा त्यात महावितरणची अवकृपा, सांगा शेती करायची कशी ?
कृषीपंप
Follow us on

बुलडाणा : कृषीपंपाची थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणकडून तगादा लावला जात आहे. वेळप्रसंगी विद्युत पुरवठाही खंडीत केला जातोय. ज्या प्रमाणे वसुलीमध्ये तत्परता दाखवली जात आहे अगदी त्याप्रमाणेच विद्युत पुरवठामध्ये दाखवली तर शेतकऱ्यांचा प्रश्न मिटणार आहे. पण सध्या शेती व्यवसाय चौहीबाजूंनी अडचणीत आहे. वातावरणातील बदलामुळे (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांचे नुकसान होत आहे तर अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये रात्रीचा दिवस करुन रब्बीतील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. सध्या (Agricultural Pump) कृषीपंपाना 7 तास विद्युत पुरवठा केला जात आहे तो ही रात्रीच्या वेळी. त्यामुळे अडचणीत असलेला बळीराजा एकच प्रश्न उपस्थित करीत आहे तो म्हणजे सांगा शेती करायची कशी? आठवड्याला कृषीपंपाना होणाऱ्या (Power supply) वीजपुरवठ्यात बदल हा ठरलेला आहे. अनेक भागात तर मध्यरात्रीच विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत असून रात्री ऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

शेतकऱ्यांना करावा लागतोय रात्रीचा दिवस

रब्बी हंगाम सुरु झाला की, महावितरणच्या विद्युत पुरवठा करण्याच्या वेळापत्रकात बदल हा ठरलेलाच आहे. या चार महिन्याच्या कालावधीत रात्री किंवा दिवसा पुरवठा करुन रब्बी पिके जोपासली जातात. पण सध्या बुलडाणा जिल्ह्यात मध्यरात्रीच विद्युत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे दिवसभर शेतीकाम आणि रात्री पिकांना पाणी देण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. सध्या तर काही भागात रात्री 1 वाजता कृषीपंपाना वीज सोडली जात आहे. केवळ 7 तासाचा पुरवठा तो ही नियमित होत नसल्याने रात्र जागून तरी काय उपयोग असा सवाल उपस्थित केला जात आहे. सध्याच्या कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे.

सक्तीची वसुली मग सुविधा का नाहीत?

रब्बी हंगामातील पीके बहरात असतानाच कृषीपंपाकडील वाढती थकबाकी पाहता विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. प्रतिकूल परस्थितीमध्येही शेतकऱ्यांनी वीजबिल अदा केले. त्यामुळे सक्तीची महावितरण सक्तीची वसुली करीत असेल तर त्याच पध्दतीने शेतकऱ्यांना सुविधाही देणे गरजेचे आहे. कारण सध्या कडाक्याच्या थंडीत रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेत जवळ करावे लागत आहे. शिवाय रात्रीच्या वेळी हिंस्र प्राण्यांसह विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचीही भीती असते. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन पिकांना पाणी द्यावे लागत आहे. सात तासच पण दिवसा विद्युत पुरवठा झाला तर सोय होणार आहे.

सर्व शेतकऱ्यांना समान पुरवठा

एकाच वेळी उपकेंद्रावरील कृषीपंप सुरु ठेवणे शक्य नाही. रब्बी हंगामात उपकेंद्रावरील भार वाढलेला असतो. त्यामुळे रोहित्रांमध्ये बिघाडही होतो. त्यामुळे आठवडानिहाय योग्य ते बदल करुन विद्युत पुरवठा केला जात आहे. सध्या शेतकऱ्यांची गैरसोय होत असली तरी त्यांच्या हीताचाच निर्णय घेतला जात असल्याचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Damage Orchards : द्राक्ष मण्यांना तडे, अंतिम टप्प्यातील केळीबागाही उध्वस्त, आता संरक्षणाशिवाय पर्याय नाही

…म्हणून जानेवारी महिन्यातच खोदल्या जातात अधिकतर विहीरी, काय आहेत कारणे? वाचा सविस्तर

Medicinal Plants : कोरोना काळात वाढतेय औषधी वनस्पतीचे महत्व, तुळशीच्या रोपांना अधिकची मागणी